शेतकरी कायद्या विरोधात राष्ट्रवादी भारत बंद मध्ये सहभागी होणार – जयंत पाटील

मुंबई : केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे. या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देत आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी शांतपणे व कोविडकाळातील मर्यादांचे पालन करून या ‘भारत बंद’मध्ये सहभागी व्हावे व या कायद्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करावा. असे आवाहनही पाटिल यांनी केले आहे.

विरोधी पक्षांकडून मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनीती :
कायदे रद्द करण्याची मागणी करत शेतकर्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला विरोधी पक्षांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्याबाबत विरोधी पक्ष राष्ट्रपतींकडे शेतकर्यांची बाजू मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता भाजप व कृषी कायद्यांविरोधात लढण्यासाठी अकाली दलानं शिवसेनेची मदत घेतली आहे. यासाठीच अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.






