पेट्रोल, डिझेल संपणार; नितीन गडकरींनी केले भविष्यातील इंधनावर भाष्य

पुणे : पेट्रोल, डिझेल संपणार असून ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. राज्यात इथेनॉल निर्मिती करणारी एक अर्थव्यवस्था तयार केली पाहिजे, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातील दुचाकी आणि रिक्षा इथेनॉलवर चालवाव्यात, अशी सुचनाही त्यांनी केली.
वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद 2022 च्या कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, काँग्रेस नेते मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह आजी माजी मंत्री उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, “जोपर्यंत शेती आणि ग्रामीण क्षेत्र विकासाच्या प्रक्रियेत पुढे येत नाही तोपर्यंत आपण आत्मनिर्भर होणार नाही. देशात तेलबिया कमी आहेत. अन्न, तेल, कीटकनाशके याची कमी आहे. येणाऱ्या काळात संशोधन आणि तंत्रज्ञान गरजेचं आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात येणाऱ्या काळात भारताला सर्वात पुढे घेऊन जायचं आहे. महाराष्ट्रात इथेनॉल निर्मिती करणारी अर्थव्यवस्था तयार केली पाहिजे, अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती आहे.”
साखर कारखाने आणि ऊस शेतीवरही त्यांनी भाष्य केलं. “ईलेक्ट्रिक ट्रक आणि ट्रॅक्टर लवकरच लॉंच केले जाणार आहे. उसाचे भाव कमी करणे फार कठीण काम आहे. साखरेचे भाव काहीही असू दे; येणाऱ्या काळात याचा त्रास होणार आहे. येणाऱ्या काळात साखरेचे दर कमी होऊ शकतात. येणाऱ्या काळात २५ ते २६ रुपये किलो साखरेचा दर होईल. पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले की साखरेचे दर कमी होतात. इथेनॉलचा वापर झाला पाहिजे. यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी बोललो आहे. त्यासाठी आपण एक बैठक घेऊ,” असे गडकरी म्हणाले.
“फ्लेक्स इंजिनमध्ये १०० टक्के पेट्रोल ऐवजी १०० टक्के इथेनॉल वापरता येईल. त्यासाठी इंजिन कंपनीला सांगतोय, पुण्यातील दुचाकी आणि रिक्षा इथेनॉलवर चालवावेत. मी इथेनॉल पंप टाकायला सांगतो. पुण्यात किती प्रदूषण आहे. त्यामूळे महाराष्ट्रात अजित पवार यांनी पुढाकार घ्यावा. येणाऱ्या काळात पुण्यात इथेनॉलचा वापर सुरु करावा,” असे आवाहन गडकरी यांनी केले.

“ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. ते तुम्ही सोप्या पद्धतीने तयार करू शकता. पेट्रोल, डिझेल संपणार आहे. त्याची जागा ग्रीन हायड्रोजन घेणार आहे. येणाऱ्या काळात तेल ही एक मोठी समस्या असेल. जर ऊस उत्पादनात तेलबिया लावल्या तर फायदा होईल. येणाऱ्या काळात त्याची गरज आहे. जेवढं शक्य होईल तेवढं इथेनॉल तयार करा. त्याचा फायदा होईल,” अशी सूचना गडकरी यांनी शेतकरी आणि साखर कारखानदारांना केली.






