महाराष्ट्रद्रोही भाजपच्या बोलघेवड्यांना महाराष्ट्रातील जनताच अद्दल घडवेल – शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे

पुणे : मुंबई साकीनाका दुर्देवी अत्याचाराची घटनेतील आरोपीला मुंबई पोलिसांनी काही तासात गजाआड केले. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला निर्देश देताना सांगितले, अशा नराधमांना वचक बसवा. इतर राज्यातून येणाऱ्या नागरिकांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे याची माहिती ठेवावी लागेल. माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेणार नाही. त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये तडजोड होणार नाही.महाराष्ट्रद्रोही भाजपच्या बोलघेवड्यांना महाराष्ट्रातील जनता अद्दल घडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.असा इशारा शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिला आहे.
मोरे म्हणाले, अनेक उपाययोजना केल्यानंतर भविष्यात होणारे गुन्हे कमी होतील, यात शंकाच नाही. परंतु भाजपाचे चंद्रकांत पाटील यांच्यासारखे काही नेते यातही राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. चंद्रकांत पाटील म्हणतात की फक्त परप्रांतीय लोकच गुन्हे करतात का? महाराष्ट्रातील लोक गुन्हे करत नाही का ? अहो पाटील परप्रांतीय गुन्हेगारांकडून गुन्हे होण्याचे प्रमाण जास्त आहे. गुन्हा केल्यानंतर आपण आपल्या राज्यात सहज जाऊ शकतो, असा परप्रांतीय गुन्हेगारांचा समज आहे.

आपल्याला शोधण्यासाठी पोलीस यंत्रणेला त्रास होईल या कारणाने काही विकृत मनोवृत्तीचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले परप्रांतीय गुन्हे करत आहेत. हे पोलीस यंत्रणेच्या लक्षात आले असून त्यांच्यावर चाप बसण्यासाठी भविष्यात असे गंभीर गुन्हे घडू नये म्हणून त्यांची नोंद होणे आवश्यक आहे. परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची नोंदी करण्यात यावी ही भूमिका केंद्र शासनाची देखील आहे. त्याबद्दलही चंद्रकांतदादांनी भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्र्यांचा निर्णय म्हणजे परप्रांतीय नागरिकांना विरोध नसून महाराष्ट्रात असे गंभीर गुन्हे घडू नये, यासाठी केलेली उपाय योजना आहे . परराज्यातील येणाऱ्या नागरिकांची नोंदणी करणे म्हणजे प्रत्येक परप्रांतीय नागरिक गुन्हेगार आहे असा याचा अर्थ होत नाही, तर परराज्यातून गंभीर गुन्हे करून आलेल्या गुन्हेगारांवर यामुळे चाप बसेल.
महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना प्रत्येक विषयावर राजकारण करण्याची नशा जडली आहे. त्यातूनच परप्रांतीयांच्या विषयावरून महाराष्ट्रातील नागरिकांचा द्वेष करून महाराष्ट्रद्रोही राजकारण करीत आहेत. चंद्रकांतदादा मते घेतात पुण्यातील कोथरूडकरांची आणि गोडवे गातात परप्रांतीय गुन्हेगारांची. याचा जाब कोथरूडकर मराठी बांधव जनता त्यांना जाब विचारल्या खेरीज राहणार नाही. महाराष्ट्राबद्दल अनेक ठिकाणी द्वेष निर्माण करण्याचे काम महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून सातत्याने होत आहे. बेळगाव मधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी उमेदवारांचा झालेला पराभव हा भाजप नेत्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. देशातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या विरोधात आपले दरिद्री विचार भाजपाचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत. या महाराष्ट्रद्रोही भाजपच्या बोलघेवड्यांना महाराष्ट्रातील जनता अद्दल घडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे मोरे म्हणाले.



