महाराष्ट्र

‘…तर सरकारला अमित शाहदेखील वाचवू शकणार नाहीत’, भाजपवालेच सांगताहेत म्हणत संजय राऊतांचे…

मुंबई : “चाळीस आमदारांना जपायचे एवढेच मुख्यमंत्र्यांचे काम आहे. मंत्रालयात पैशांच्या मोठय़ा उलाढाली सुरू आहेत. त्या उलाढाली एक दिवस अंगलट येतील व सरकारला अमित शहादेखील वाचवू शकणार नाहीत, असे भाजपवालेच सांगतात. कामाख्या देवीचे नवसही अशा वेळी कामी येणार नाहीत, हेच खरे”, असं मोठं विधान संजय राऊतांनी ‘सामना’मधील रोखठोकमध्ये केलंय.

Img 20221126 wa0212847205965836399706

आदित्य ठाकरेंवर टीका करण्याचा अधिकार नाही

“एकनाथ शिंदे यांचे मान खाली घालून भाषण वाचन सुरू झाले की अगदी नको वाटते, असे लोक सांगतात. पुन्हा त्यांचे खासदार चिरंजीव हेच त्यांच्यासोबत कायम असतात. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्याचा अधिकार या मंडळींना नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयात गर्दी असते व ते त्या गर्दीत जाऊन लोकांच्या कागदावर सह्या करतात. याचे कौतुक त्यांचेच लोक करतात, पण मुख्यमंत्र्यांनी सह्या केलेल्या त्या कागदाचे पुढे काय होते हेसुद्धा समजून घेतले पाहिजे”, असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारमध्ये सुरू असलेल्या व्यवहारांवर शंका उपस्थित केली आहे.

देवेंद्र फडणवीस हे ओझे कसे पेलणार

“चाळीस आमदारांना महाराष्ट्रातील रस्ते, बांधकाम, पालिकेचे ठेके हवे आहेत. ते मिळत आहेत. गेल्या तीन महिन्यांत मुंबई-ठाणे महानगरपालिकेत नेमके काय व्यवहार झाले व मलई कोठे गेली व ती किती हजार कोटींची होती? याचे स्वतंत्र ऑडिट व्हायला हवे. मुख्यमंत्र्यांच्या घरातूनच हे सर्व आदेश दिले जातात. हे खरे मानले तर फडणवीस हे सर्व ओझे कसे पेलणार? हा प्रश्नच आहे”, असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांना इशारा दिला आहे.

कर्नाटक सीमाप्रश्नी वेळकाढूपणाचे धोरण

संजय राऊत म्हणाले,”30 तारखेस सर्वोच्च न्यायालयात या प्रश्नी सुनावणी होणार म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे दोन दिवस आधीच दिल्लीत ठाण मांडून बसले व तेथे बसून पत्रकारांशी संवाद साधत होते. या काळात आपले मुख्यमंत्री कोठे गायब होते? महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नात तर त्यांची खरी कसोटी लागणार आहे. दिल्लीच्या नाकर्तेपणाचे सर्व ओझे आता त्यांच्या खांद्यावर येईल; कारण ‘सीमा प्रश्नासाठी आम्ही चाळीस दिवस बेळगावच्या तुरुंगात होतो,’ असा डांगोरा त्यांनीच पिटला आहे. त्यामुळे ते आता काय करणार?”

“चंद्रकांत पाटील व शंभू राजे देसाई या दोन मंत्र्यांना बेळगावात पाठवून काय साध्य होणार? हे वेळकाढूपणाचे धोरण ठरेल. कर्नाटकात आज भाजपचे मुख्यमंत्री आहेत व महाराष्ट्रात भाजपपुरस्कृत शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सीमा प्रश्न सुटला तर आनंदच आहे, पण त्यासाठी जी हिंमत व धमक लागते ती आपल्या मुख्यमंत्र्यांत दिसत नाही व भाजपचे महाराष्ट्रातील लोक शिंदे यांची मजा पाहत आहेत. शिंदे यांना फार लोकप्रियता व यश लाभू द्यायचे नाही असे एकंदरीत धोरण आहे”, असं म्हणत राऊतांनी भाजपकडे अंगुली निर्देश केलाय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये