पालिकेच्या शहरी गरीब सहाय्य योजनेत पेशंट रुग्णालयात ॲडमिट झाल्यापासून बिलात सवलत द्या ; दिपाली धुमाळ यांची मागणी

पुणे : पुणे महापालिकेच्या शहरी गरीब सहाय्य योजनेत प्रशासनाकडून सातत्याने बदल करण्यात येत असल्याने या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचा आरोप महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे.

धुमाळ यांनी म्हंटले आहे की, पुणे शहरामध्ये शहरी गरीब सहाय्य योजनेचा लाभ अनेक नागरिक घेत आहे व अनेक नागरिकांनी घेतलेला आहे. पूर्वी या योजनेच्या अंतर्गत रुग्ण हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यापासून ते डिस्चार्ज मिळेपर्यंतच्या सर्व दिवसांचे जे काही हॉस्पिटलचे बिल व्हायचे त्याच्या निम्मे म्हणजे ५०% बिल माफ करण्यात यायचे.
मात्र सध्या पालिकेने यामध्ये बदल केला असून रुग्ण हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यानंतर शहरी गरीब योजनेचे कार्ड ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल करतो तेव्हा पासून पुढचे बिलात सवलत दिली जाते. पूर्वी सारखे संपूर्ण दिवसाच्या बिलात सवलत दिली जात नाही. यामुळे अनेक रुग्णांना नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत असून अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांना सावकारी कर्ज काढण्याची वेळ येत आहे. पालिकेने ही योजना गरीब रुग्णांना रुग्णालयाच्या येणाऱ्या भरमसाठ बिलात दिलासा मिळावा त्यांचा आर्थिक ताण कमी व्हावा म्हणून सुरू केली आली असताना त्यामध्ये बदल करून जर रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असेल तर हा बदल करण्याचे कारण काय असा सवाल धुमाळ यांनी उपस्थित केला आहे.
सदरील योजनेत नव्याने बदल न करता पूर्वीप्रमाणे सवलती मिळाव्यात तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची अट १ लाख ६० हजार आहे, ती वाढवून २ लाख रुपये करण्यात यावी अशी मागणी दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.









