७२ तासात एरंडवणे परिसरातील पाणी प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

कोथरूड : नळस्टॉप, सहकार वसाहत, पं.नेहरू वसाहत, दहा चाळ, (गणेशनगर) व एरंडवणे परिसरातील नागरिक कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठा व अपुऱ्या पुरवठयामुळे त्रस्त झाले आहेत. “एस एन डी टी टाकीची लेव्हल राखली जात नसल्याने व एल अँड टी ची 6 इंची लाईन जोडणी पूर्ण न झाल्याने पाणी कमी दाबाने व कमी वेळ येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र नागरिकांना होणार त्रास पाहता हा पाणी प्रश्न ७२ तासात सोडवला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी दिला आहे.
या संदर्भातील निवेदन मंजुश्री खर्डेकर व भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्याकडून महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. खर्डेकर म्हणाले याबाबत १५ दिवसापूर्वी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याशी विस्तृत चर्चा केली होती. त्यांनी त्वरित प्रश्न सोडविण्याचे मान्य केले होते, मात्र अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे येत्या ७२ तासात पुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा वा अन्य मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाणार आहे.

“तुम्ही जादा पाणी वापर करत आहात व तुमच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल अशा स्वरूपाच्या नोटीसा महापालिकेकडून नागरिकांना पाठविल्या जात आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात पावसकर यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार याबाबत नागरिकांना घाबरवणे सोडून प्रशासनाने लोकशिक्षणावर तसेच जादा वापराची कारणे शोधण्यावर भर द्यावा अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.






