छत्रपती संभाजीनगरच्या सभेत अनेक मुद्द्यांवर उध्दव ठाकरेंनी भाजपला घेरलं

छत्रपती संभाजीनगर : हेच ते शहर, जिथे १९८८ साली आपण महापालिका शिवसेनेच्या हाती दिल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी या शहराचं नाव संभाजीनगर करतोय असं म्हटलं होतं. त्यानंतर काय घडलं ते आपण पाहिलं. आपण २५ वर्ष भ्रमात होतो. दोनवेळा आपलं सरकार आलं. दोन्ही वेळेला केंद्रात आणि राज्यात युतीचं सरकार होतं. पण औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर झालं नव्हतं. त्यामुळे मी मविआच्या सहकाऱ्यांना धन्यवाद मानतो की त्यांनी ते करुन दाखवलं अस म्हणत उध्दव ठाकरेंनी भाजपवर नामांतराच्या विषयावरून निशाणा साधला
छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची आज पहिली एकत्रित जाहीर सभा पार पडली. या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली. देशात सुरु असलेल्या घटनांनुसार आपली लोकशाही धोक्यात आली असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले.
निवडणुकांवरून भाजपला लक्ष्य करताना ठाकरे म्हणाले, ज्यावेळेला जातीय तेढ निर्माण होईल तेव्हा समजून जावा निवडणुका जवळ आल्या आहेत. हिंदू जनआक्रोश नवीन सुरु झालाय. मुंबईत मोर्चा निघाला होता. कुठून काढला माहिती नाही. पण शिवसेना भवनपर्यंत आला होता. याचा अर्थ एकच जगातला सर्वात शक्तिमान हिंदू नेता या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर हिंदूंना आक्रोश करावा लागतोय मग नेत्याची काय शक्ती आहे? मविआच्या सरकारमध्ये कोणत्याही समूदायाला आक्रोश करण्याची वेळ आली नव्हती.

माझ्यावरती आरोप करत आहेत. मी हिंदुत्व सोडलं. या छत्रपती संभाजीनगरच्या मैदानात विचारतो की मी खरंच हिंदुत्व सोडलं तर एक उत्तर द्या. मी घरात जावून बसेन. पुन्हा तोंड दाखवणार नाही. तुम्ही म्हणता, आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं. मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तेव्हा मेहबूबा मुफ्ती बरोबर काश्मीरमध्ये सरकार बनवलं तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
‘पंतप्रधानांची पदवी दाखवा म्हणून मागितलं तर 25 हाजारांचा दंड बसतो. आज या व्यासपीठावर जयंत पाटील आणि मी आहे. आम्ही दोघं बालमोहन विद्यामंदिर या एकाच शााळेचे आहोत. त्या शाळेला मंत्री झाल्यानंतर अभिमान वाटला होता. असा अभिमान पंतप्रधान ज्या कॉलेजमध्ये शिकले त्यांना का वाटू नये? पदवी मागितली तर दाखवणार नाही. मग या पदवीचा उपयोग दंड भरण्यासाठी घेता का काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
‘देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेला’
“अजित पावारांनी जो उल्लेख केला की, मराठवाडा साधुसंतांचा आहे. एकेकाळी भाजपच्या मंचावर साधुसंत असायचे. पण आता संधीसाधू असतात. तो जमाना अटलजींचा होता. या देशातील लोकशाही संपवून टाकायची, एकही विरोधी पक्ष या देशात शिल्लक ठेवायचा नाही. राहिला तर जेलमध्ये टाकायचं. देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेला चाललीय. सावरकरांची यात्रा काढताय तर काढा. पण त्यांचं अखंड हिदुस्तानचं स्वप्न पूर्ण कराल का?”, असा सवाल त्यांनी केला.
“लोकशाही कशी असली पाहिजे तर इस्त्राईलसारखी असली पाहिजे. जो घातक प्रकार देशात भाजप करु इच्छित आहे, न्यायव्यवस्थेत आपली माणसं घेऊ पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आमचं ऐकलंच पाहिजे, असे प्रयत्न सुरु आहेत. ज्यादिवशी न्यायालयावर यांच्या ताब्यात जाईल त्यादिवशी लोकशाही संपेल. इस्ज्ञाईलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र. नेत्यान्याहू यांनी तसा प्रयत्न केला तेव्हा देशाने संप पुकारला. मंत्री, पोलीस प्रमुख संपावर गेले. राष्ट्रपतींनीसुद्धा पंतप्रधानांना झापलं. लोकांनी एवढा प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर पंतप्रधानांना घराबाहेर पडणं मुश्किल झालं”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.



