कोथरूडमध्ये महागाईविरोधात ‘राष्ट्रवादी’चा ‘जनआक्रोश’ ; सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारवर कडाडून टीका

पुणे : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅसच्या दरात केलेली वाढ आणि घरगुती वापराच्या वस्तूंवर लादलेला जीएसटी इत्यादींच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पुण्यात भुसारी कॉलनी येथे जनआक्रोश आंदोलन घेण्यात आले.
यावेळी माजी सभागृहनेते शंकर केमसे, माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, आद्यक्रांती गुरू लहुजी साळवे स्मारक समिती अध्यक्ष विजय डाकले, कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष काका चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कांबळे, जयश्री मारणे, अरुण कदम, सीताराम तोंडे आदी उपस्थित होते.
“भाजीपाला ते औषधींपर्यंत केंद्र सरकारने महागाई करून ठेवली आहे. या महागाईमधून देशातील जनतेला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजे. मात्र हे सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. म्हणून महागाईच्या विरोधात आम्ही आंदोलन करुन या सरकारला जागे करण्यासाठी अखेरपर्यंत आंदोलन करीत राहणार आहोत.” असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पेट्रोलवरील ५ रुपये कमी करून काही होणार नाही. केंद्र सरकार यंत्रणा आणि पैशाच्या जोरावर चुकीच काम करीत आहे. ही दुर्दैवाची गोष्ट असून देशासाठी धोक्याची घंटा आहे. देशाच ऐक्य आणि संविधान धोक्यात आलं आहे. हे केंद्र सरकारच्या कृतीतून दिसत आहे. चांदणी चौकातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर जिल्हाध्यक्ष यांच्याशी माझं बोलणे झाले आहे. चांदणी चौकामधील पूल पाडावा लागेल, असे त्यांनी सांगितले. मात्र पूल पाडण्या अगोदर पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा.” असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं.
भाजपने निर्मला सीतारामन यांच्याकडे बारामती मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे, यावर प्रतिक्रिया विचारण्यात आल्यावर सुप्रिया सुळेंनी म्हटले की, “मी निर्मला सीतारामन यांचे मनापासून स्वागत करते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा काय म्हणतात, एक पार्टी एक देश पण आमचं त्याच्या बरोबर विरोधात मत आहे. आमचा पक्ष बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालणार पक्ष आहे. त्यामुळे एक देश आणि अनेक पक्ष राहिलेच पाहिजे. निर्मलाताई जेव्हा येतील, तेव्हा मी स्वतः स्वागत करेल त्यांनी त्यांचा पक्ष का वाढवू नये. आम्ही आमचा पक्ष वाढवावा, त्यामध्ये गैर काय आहे. मला या मतदार संघावर प्रचंड प्रेम आहे. तसेच बारामती तर प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. तिथे जे पाहुणे येतात ते सर्टिफिकिट देत आहेत, त्याबद्दल मला मनापासून आनंद आहे.” असंही यावेळी सुळे यांनी बोलून दाखवलं.
रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीचे प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीने दिल्याची माहिती समोर आली आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी सांगितले की, “त्याची अजून चौकशी सुरू नाही. चौकशी करणार अशी बातमी मी पाहिली आहे. त्यावर रोहित सोबत बोलणे झालं आहे. त्याला काही नोटीस आलेली नाही. आमच्या कुटुंबातील कोणालाही नोटीस आली तर आमची सहकार्याची भूमिका राहिली आहे. माझा न्याय व्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला काही लपवायची गरज नाही. त्यामुळे आम्हा कोणालाही नोटीस आलीच तर कोणाला काही अडचण येणार नाही. असे काही प्रसंग आले तर आम्ही त्याला नक्कीच उत्तर देऊ.”




