वारजेत आठवडी बाजाराच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार ताजा भाजीपाला : महिला बचत गटांनाही बजारपेठ उपलब्ध

वारजे : वारजे येथील नादब्रह्म सोसायटी जवळील खेळाच्या मैदानावर विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या आठवडी बाजाराला पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ पुरस्कृत
मालधनी ॲग्रोटेक इं. प्रोड्युसर कं.लि. च्या सहकार्याने
शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या योजनेअंतर्गत हा शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे.
या आठवडी बाजाराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिपाली धुमाळ, बाबा धुमाळ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिपाली धुमाळ म्हणाल्या नागरिकांना परिसरातच थेट शेतातून आलेला ताजा भाजीपाला, फळे मिळावीत या हेतूने हा आठवडी बाजार सुरू करण्यात आला असून त्याला पहिल्याच दिवशी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे स्थानिक बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना या ठिकाणी विक्रीसाठी संधी देण्यात आली असल्याने त्यांना ही नवीन बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून बचत गटातील महिलांनाही आपल्या तयार वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहचवता येणार आहेत. हा आठवडी बाजार दर मंगळवारी सायंकाळी ४ ते रात्री ९ वेळेत सुरू राहणार आहे.

थेट शेतकरी गट व महिला बचत गटाचा उत्पादीत माल हे या बाजाराचे प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहे. जवळच आठवडे बाजार सुरू झाल्याने ताजा भाजीपाला मिळणार असल्याने व त्याचा थेट फायदा शेतकरी बांधवांना होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.





























