काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन..

केल्या जात असलेल्या व्यवस्थेची मोहोळ यांनी दिली माहिती
पुणे : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे मृत्युमुखी पडले आहेत. सुदैवाने त्यांच्या पत्नी आणि मुलगी सुरक्षित आहेत. आज संध्याकाळी सहा वाजता त्यांचे पार्थिव श्रीनगरमधून पुण्यात आणले जाणार असल्याची माहिती नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. मोहोळ म्हणाले, मुंबईतील मृत्युमुखी झालेल्या नागरिकांचे पार्थिव आज दुपारी बाराच्या विमानाने मुंबईला आणले जाणार आहेत. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाइकांशी सातत्याने संपर्कात आहोत. आज दुपारी तीन वाजता मुंबईहून श्रीनगरकडे जाणाऱ्या विशेष विमानाने अडकलेल्या लोकांना परत आणण्यात येणार आहे.
पुण्यातील सुमारे दीडशे ते पावणे दोनशे नागरिकांचा एक गट काश्मीरमध्ये अडकलेला आहे. या लोकांना परत आणण्यासाठी स्वतंत्र मुंबई-पुणे विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. अडकलेल्या नागरिकांशी सातत्याने संपर्कात असून त्यांना विश्वास दिला आहे की, आम्ही त्यांच्या सोबत आहोत.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी आज विशेष विमानाची योजना करण्यात आली असून, यासाठी मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. श्रीनगरचे जिल्हाधिकाऱ्यांशीही सातत्याने चर्चा सुरू आहे. गृह विभागाचे संयुक्त सचिव सध्या श्रीनगरमध्ये आहेत. ते मराठी असल्यामुळे विशेष मदत मिळत आहे.
मोहोळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मी स्वतः या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांशीही संपर्क साधण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांचा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. ०२० – २६१२३३७१ या क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा. मी सर्व नातेवाइकांना आवाहन करतो की, घाबरून जाऊ नये. आम्ही अडकलेल्या सर्व नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षितपणे परत आणण्याचे प्रयत्न करत आहोत.









