भावाला ओवाळण्यासाठी शुभ वेळ कोणती? भाऊबीजचे महत्त्व..

भाऊबीज ही भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. भाऊबीज दिवशी यमद्वितीयाही असते. भाऊबीजेला भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो. तिथे बहीण भावाचा सन्मान करून त्याला ओवाळते-औक्षण केलं जातं. त्यानंतर भाऊ बहिणीच्या घरी जेवतो. एकमेकांना सुखी जीवनासाठी प्रार्थना करतात. भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात. पुरी येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांच्याकडून जाणून घेऊ, यावर्षी भाऊबीज कधी आहे? भाऊबीज दिवशी यमद्वितीया का असते. भाऊबीज दिवशी औक्षण करण्याची शुभ वेळ? भाऊबीजचे महत्त्व काय?

वैदिक दिनदर्शिकेनुसार या वर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी मंगळवार, 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 02:36 पासून सुरू होईल. ही तिथी बुधवार 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 01:47 पर्यंत वैध आहे. उदयतिथीच्या आधारे यंदा भाऊबीज बुधवार, 15 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येईल. पण, काही ठिकाणी 14 नोव्हेंबर रोजीही भाऊबीज साजरी केली जाईल.



14 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी करणार असल्यास औक्षण करण्यासाठी दुपारी 01:10 ते 03:19 ही वेळ शुभ राहील. तर 15 नोव्हेंबर रोजी भाऊबीज करणाऱ्यांसाठी औक्षणसाठी शुभ मुहूर्त सकाळी 10.40 ते दुपारी 12.00 पर्यंत आहे.



15 नोव्हेंबर रोजी भाऊबीजच्या दिवशी अतिगंड योग आणि सुकर्म योग तयार होत आहेत. अतिगंड योग सकाळपासून दुपारी 12.08 पर्यंत आहे. तेव्हापासून सुकर्म योग तयार होत आहे, जो दिवसभर चालू राहतो
भाऊबीजेला यमद्वितीया असते. पौराणिक कथेनुसार, कार्तिक शुक्ल द्वितीया तिथीला मृत्यूचे देवता यमराज प्रथमच आपली बहीण यमुना हिच्या घरी गेले होते. काही काळापूर्वी यमुनेने त्यांना सांगितलं होतं की, सर्व भाऊ बहिणीच्या घरी येतात आणि तू कधीच येत नाहीस. त्यावर यमराज दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी यमुनेच्या घरी आले.



तेव्हा यमुनेने यमराजाचे स्वागत केले. त्यावर यमराज खूप प्रसन्न झाले. त्याने बहिणीला वरदान मागायला सांगितलं. यावर यमुना म्हणाली की, कार्तिक शुक्ल द्वितीयेला जो भाऊ बहिणीच्या घरी जातो, त्याला यमाचे भय राहणार नाही. यावर यमराज म्हणाले की, जो भाऊ भाऊबीजच्या दिवशी बहिणीच्या घरी जातो त्याला मृत्यूची भीती उरणार नाही. भाऊबीज यमराजाशी संबंधित आहे, म्हणून याला यमद्वितीया असेही म्हणतात.
रक्षाबंधनानंतर भाऊबीज हा सण बहिणी आणि भावांसाठी साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार हा सण साजरा केल्याने भावाला अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते. बहिणीला भावाच्या सुख-समृद्धीसाठी शुभेच्छा.































































