मानवाच्या तात्त्विक उत्क्रांतीचा विचार मांडणारी लेखणी हरपली; ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांचे निधन
पुणे : ज्येष्ठ लेखक, कांदबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचे आज (२२ जुलै) पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.
मराठी साहित्यातील विविध प्रांतात मोलाची भर घालणारे खरे विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टीचा पुरस्कार करणारे लेखक म्हणून ओळखले जायचे. ‘अंताजीची बऱखर’, ‘उद्या’, ‘बखर अंतकाळाची’ या त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय झाल्या. मानवाच्या जडणघडणीचा साद्यंत अभ्यास करून त्यांनी सिद्ध केलेला ‘कहाणी मानवप्राण्याची’ हा ग्रंथ त्यांच्या वैचारिक लेखनाची ओळख घडवणारा ठरला आहे. नंदा खरे यांनी वृत्तपत्रीय लेखनही विपुल प्रमाणात केले आहे. वैचारिक भूमिकेशी ठाम राहून कोणतीही तडजोड न करता लेखन करणारा साहित्यिक अशीच त्यांची ओळख आहे.
नंदा खरे यांनी मानवाच्या तात्त्विक उत्क्रांतीचा सूक्ष्म तपशीलानिशी व तेवढ्याच तटस्थपणे अवलोकन करीत समाजातील विषमता आणि अज्ञानाच्या विरोधात प्रदीर्घ लेखन केले. साहित्य आणि विज्ञानाची अशक्य वाटणारी सांगड घालत त्यांनी साहित्यातले बहुस्तरीय पदर वाचकांपुढे उघड केले. त्यांच्या निधनाने मानवाच्या तात्त्विक उत्क्रांतीचा विचार मांडणारी लेखणी कायमची हरपली.