आरोग्य

सौंदर्याने भरलेली सृष्टी पाहण्यासाठी अंधांना देऊ दृष्टी : दृष्टीदान दिनाच्या निमित्ताने विशेष लेख..

आज दृष्टीदान दिन
सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० जून हा दिवस ‘दृष्टिदान दिन’ म्हणून साजरा केला जातो. मृत्यूनंतर नेत्रदान करावे, याच्या प्रसारासाठी स्वयंसेवी संस्था पुढे सरसावत आहेत. आज २१ व्या शतकातील विज्ञान इतके पुढे गेले आहे, की एका व्यक्तीचे डोळे आणि पर्यायाने त्याची दृष्टी घेऊन ते दुसऱ्याला म्हणजे ज्या व्यक्तीला दृष्टी नाही, अशा व्यक्तीला सहज देता येतात.

डॉ. एस. एफ. देशमुख
प्राचार्य आरोग्य व कुटूंब कल्याण,
प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर

डोळे ही ईश्वराने मानवाला दिलेली फार मोठी देणगी आहे. परंतु, काही व्यक्ती यापासून वंचित असतात. काही कारणास्तव त्यांना अंधत्व प्राप्त होते. त्यामुळे अशा व्यक्ती जगाचे सौंदर्य पाहू शकत नाहीत, सौंदर्याने भरलेली सृष्टी ज्यांना पाहता येत नाही. या व्यक्तींना नेत्र मिळाले, तर ते सृष्टीचा आस्वाद घेऊ शकतील. परमेश्वराने माणुसकी या नात्याने दृष्टी असणाऱ्या व्यक्तीने दृष्टिहीन व्यक्तीला नेत्रदान केले, तर दात्याच्या जीवनाचे नक्कीच सार्थक होईल. एकंदरित काय, दृष्टी ही फार महत्त्वाची आहे. कलियुगात दानाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. अवयवदान, रक्तदान, नेत्रदान आदींना फार महत्त्व आहे.

भारत सरकारने यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. दृष्टिविकार प्रतिबंधक आणि अंधत्व नियंत्रण कार्यक्रम हा शंभर टक्के केंद्र सरकार पुरस्कृत असून, अनेक नेत्रपेढ्या, फिरती नेत्रपथके कार्यरत आहेत. राज्यात सुमारे नऊ लाखांपेक्षा जास्त अंध व्यक्ती असून, या नेत्रदान जागृतीमार्फत लाखो व्यक्तींना दृष्टी प्राप्त होऊ शकते. नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान मानण्यात आले आहे. शिवाय नेत्रदान हे मृत्यूनंतर करायचे असल्याने कसलीच भीती नाही. नेत्रदानासाठी व्यक्तीच्या मृत्यूनंतर दोन तासांच्या आत डोळे काढले पाहिजेत. ज्या लोकांना बुबुळाच्या विकारामुळे अंधत्व आले आहे. अशा लोकांना नेत्रदानाचा फायदा होतो. त्यालाच कॉर्नियल ब्लाइंडनेस असे म्हणतात. नेत्रदानानंतर केवळ डोळ्याच्या बुब्बुळाचे प्रत्यार्पण केले जाते. पूर्ण डोळा बदलला जात नाही.

Img 20220610 wa00017276715392653490645

बुब्बुळ (कॉर्निया) म्हणजे काय?
घडळयाच्या तबकडीवर ज्याप्रमाणे संरक्षक काच असते, त्याचप्रमाणे डोळ्यामध्ये पूर्ण पारदर्शक आवरण असते. त्यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते. मुख्यतः बाहेरील प्रकाशकिरण डोळ्यात जाऊन दृष्टी प्राप्त होते. ज्यावेळी हे पारदर्शक बुब्बुळ अपारदर्शक होते, तेव्हा साहजिकच अंधत्व येते.

अंधत्वाची कारणे
डोळ्याला होणारी इजा उदा. बुब्बुळाला होणाऱ्या जखमा, असंरक्षितरित्या पेटविलेले फटाके, कुपोषणामुळे, इन्फेक्शन (जंतू प्रादुर्भाव) मुळे, देवी, कांजिण्या, इ. विकारामुळे, डोळयात काही केमिकल्स गेल्यास व अनुवंशिकता या कारणांमुळे अंधत्व येऊ शकते.

नेत्रदान कोण करू शकतो?
नेत्रदान केवळ मृत्यूनंतर करता येते. बालकापसून वृध्दांपर्यंत कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते.

ज्यांना चष्मा आहे, ते सुध्दा नेत्रदान करू शकतात. ज्यांना ब्लडप्रेशर, डायबिटीस, दमा, इ. विकार असतील व मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती सुध्दा नेत्रदान करू शकतात.

नेत्रदान कोण करू शकत नाही?
एड्स, हिपेटेटिस (लिव्हरचे आजार), सेप्टिसिमिया (रक्तातील जंतू प्रादुर्भाव), ब्लड कॅन्सर, इ. आजार झालेले रुग्ण नेत्रदान करु शकत नाहीत.

Img 20220609 wa00164383435053372771588

नेत्रदानाच्या वेळी घ्यावयाची काळजी –
मृत व्यक्तीस ज्या खोलीत ठेवले आहे. तेथील पंखा बंद करावा. त्याचे डोळे बंद करून डोळयावर ओला कापूस अथवा ओला रुमाल ठेवावा व डोक्याखाली जाड उशी ठेवावी. आपल्या डॉक्टरांकडून डेथ सर्टिफिकेट (मृत्यूचा दाखला) तयार ठेवावा. डोळ्यातील बुब्बळ मृत्यूनंतर सहा तासाच्या आत काढावे लागतात. जरी मृत व्यक्तीने नेत्रदानाचे इच्छापत्र भरले नसेल, तरीही नातेवाईकांना त्या व्यक्तीचे नेत्रदान करता येते.

Img 20220610 wa0000507258318610830201

नेत्रपेढीचे काम –
नेत्रदानाचा फोन आल्याबरोबर नेत्रपेढीचे तज्ज्ञ डॉक्टर त्वरित जाऊन रुग्णाचे बुबुळे काढून नेतात. त्यावेळी नेत्रदात्याचे रक्तही तपासणीसाठी काढले जाते.नेत्रदानाने चेहरा विद्रूप होत नाही. दान केलेले नेत्र सुरक्षित रित्या नेत्रपेढीत नेऊन त्याची तपासणी करून योग्य त्या रुग्णावर आरोपण केले जाते. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते. तरी आजच नेत्रदानाचा संकल्प सोडा व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करा.

मोतीबिंदू, दृष्टिदोष, अ जीवनसत्त्वाचा अभाव, बुबुळाचे विकार, बुबुळाची अपारदर्शकता ही अंधत्वाची कारणे पहायला मिळतात. या प्रकारचे अंधत्व हे तात्पुरत्या स्वरूपात मोडते. हे अंधत्व दूर करता येणे शक्य आहे. काचबिंदू नेत्रपटल विकृती यामुळे कायमस्वरूपी विकृती येऊ शकते. जगातील एकूण अंधांपैकी भारतात एक चतुर्थाश अंध आहेत. या आकडेवारीत वर्षानुवर्षे वाढच होत आहे. यासाठी वेळीच उपाययोजना व्हायला हवी.

Img 20220608 wa00062205358887987412776

भारतात असणा-या एकूण दीड कोटी अंधांपैकी सुमारे 90 टक्के व्यक्ती या 45 पेक्षाही कमी वयोगटातील आहेत. भारतात दरवर्षी 12 ते 13 दशलक्ष व्यक्ती मृत होतात. यापैकी केवळ 7,500 लोकच नेत्रदान करतात. ही तफावत दूर होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. डोळ्यांच्या बाह्य आवरणांपैकी एक षष्ठांश भागाला बुब्बुळ म्हटले जाते. बुबुळ हे घड्याळाच्या काचेप्रमाणे एक पारदर्शक पटल आहे. प्रकाशची पटले दृष्टिपटलावर एकत्रित करण्याचे प्रमुख कार्य बुबुळ करते. डोळ्यांना बुबुळांमुळे संरक्षण मिळते. ज्या कारणांमुळे प्रामुख्याने अंधत्व येऊ शकते त्यात जंतुसंसर्ग, मार लागणे, शस्त्रक्रियेची गुंतागुंत, शस्त्रक्रियेनंतर आरोग्याची काळजी, कुपोषण, आनुवंशिकता, भोंदू-वैदूंकडून केले जाणारे उपचार यामुळे बुबुळ खराब होऊन अपारदर्शकता प्राप्त होते. यावर बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हे फार मोठे वरदान आहे. या शस्त्रक्रियेत अपारदर्शक बनलेले बुबुळ काढून त्याजागी मरणोत्तर नेत्रदान करणा-या व्यक्तीचे बुबुळ प्रत्यारोपित करण्यात येते. यामुळे रुग्णाला पुन्हा दृष्टी मिळते. डोळ्याचा आकार स्थिर ठेवण्यासाठी किंवा बुबुळाच्या ब-या न होणा-या आजारांसाठी करण्यात येते. संकलित केलेली बुबुळे 4 डिग्री तापमानात एक विशिष्ट रसायन असणा-या बाटलीत 48 तासांपर्यंत ठेवता येतात. तसेच इतर विशेष रसायनांमध्ये ते बुबुळ दोन ते तीन ते आठवड्यांपर्यंत सुरक्षित ठेवता येतात.

Img 20220609 wa00146435178914062122879

नेत्रदानासाठी काय हवे? मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 मध्ये पारित करण्यात आला. या कायद्याच्या आधारे एमबीबीएस नोंदणीकृत डॉक्टरच नेत्रसंकलन करु शकतात. हे नेत्रसंकलन घरी, रुग्णालयात, स्मशानभूमीत वा इतरत्रही करण्यात येते. नेत्रसंकलनासाठी दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी लागतो. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यादीही नेत्रपेढीकडे तयार असते.

नेत्रदानाची सर्व माहिती गुप्त ठेवण्यात येते. बुबुळ प्रत्यारोपित व्यक्तीला याबाबत काहीही माहिती देण्यात येत नाही. मृत्युपूर्व नेत्रदानाचा संकल्प नसला तरीही मृतांच्या जवळील नातेवाईकही यासाठी संमती देऊ शकतात. यात महत्त्वाची बाब ही की पूर्ण डोळा प्रत्यारोपित केला जात नाही तर केवळ बुबुळ प्रत्यारोपित करण्यात येते. नेत्रदानामुळे मृताच्या चेह-यावर कुठेही विद्रूपता येत नाही.

नेत्रदानाबाबत समाजात आजही काही अंधश्रद्धा आहेत. या दूर व्हायला हव्यात. यामध्ये डोळ्याच्या जागी खड्डा पडणे, पुढच्या जन्मी येणारे अंधत्व, अतिवृद्ध व्यक्तीचे डोळे नेत्रदानासाठी योग्य नसणे, नेत्रदान खर्चीक बाब असल्याचा समज, नेत्रदानात धर्म किंवा जातीचा येणारा अडसर, अंत्यविधीला विलंब होणे यासारखे खोटे समज समाजमनावरून पुसले जायला हवेत.

कसे होते नेत्रदान
नेत्रपेढीची भूमिका महत्त्वाची असते. नेत्रदात्याचे मरणोत्तर नेत्र संकलन करणे हे या पेढीचे प्रमुख कार्य, नेत्रदात्याची मरणोत्तर रक्ततपासणी एचआयव्ही व हिपेटायटिससाठी करण्यात येते. सूक्ष्म यंत्रांच्या माध्यमातून या बुबुळांची तपासणी करून त्यांची प्रत्यारोपणासंदर्भात योग्यता तपासण्यात येते. नेत्रदानाबाबत कॉल आल्यानंतर संबंधित रक्तपेढीच्या डॉक्टारांची टीम त्वरित त्या ठिकाणी पोहोचते. यामुळे अंत्यविधीला कोणत्याही प्रकारचा विलंब होत नाही.
अन्नदान यापेक्षा जर नेत्रदान करून एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी दिली, तर आयुष्यात आपल्या कर्तबगारीने दाता खूप मोठा होईल. त्याच्या हातून कदाचित समाजकार्यदेखील घडेल.

१० जून हा जागतिक दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो, कारण त्या दिनाचे औचित्य साधून दृष्टिदानाचे स्मरण राहील. त्यामुळे मरणोत्तर नेत्रदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्ती आताच नेत्रपेढीत जाऊन विहित नमुन्याचा फॉर्म भरून दिला, की मरणोत्तर नेत्रदानाचे कार्य सत्कारणी लागेल.

Img 20220521 wa0000

दृष्टी नसेल तर जीवन अंध:कारमय बनते. दृष्टीहिनतेमुळे आज कोट्यवधी लोक हे सुंदर जग बघू शकत नाहीत. या अंधांचे जीवन सुखकर बनण्यासाठी नेत्रदानाची चळवळ देशात उभी राहिली. त्याविषयी सातत्याने जागृती केली जाते. नेत्रदानाचा संकल्प अनेकजण करतात. मरणोत्तर नेत्रदानाची चळवळ हळूहळू वाढते आहे. त्याचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. प्रत्यक्षात बायपटल रोपणाची मागणी आणि होणारा पुरवठा यात तफावत आहे. ती दूर झाल्यानंतरच चळवळ खऱ्या अर्थाने यशस्वी होईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये