वाहतूक कोंडी, जलपर्णी हटविणे यात प्रशासनाचे दुर्लक्ष नियोजन समिती बैठकीत आमदार शिरोळे यांनी व्यक्त केली नाराजी

पुणे : पुण्यातील पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी आणि मुळा-मुठा नदीतील जलपर्णी हटविण्याबाबत वारंवार सूचना करुनही त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याबद्दल पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी नाराजी व्यक्त केली.
पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक मा.पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज ( सोमवारी) झाली. या बैठकीत पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी आणि मुळा-मुठा नदीतील जलपर्णी हटविण्याबाबत आमदार शिरोळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचे निराकरण व्हावे यासाठी दिनांक २२ सप्टेंबर रोजी ‘पुम्टा’ची बैठक झाली. यामध्ये पर्यायी रस्ते उपलब्ध करून देणे, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत सर्व मार्गांवर वाहतूक पोलीस बंदोबस्त ठेवणे, खड्डे बुजविणे, डांबरीकरण करणे, रुंदीकरण करणे आदी सूचना मांडल्या होत्या. अद्यापही त्या सूचनांचे प्रशासनाकडून पालन झाले नसल्याचे आमदार शिरोळे यांनी निदर्शनास आणून दिले.
मुळा-मुठा नदीतील जलपर्णी हटविण्यासाठी जैविक पद्धतीचा वापर ठाणे जिल्ह्यात करण्यात आला होता. त्याच धर्तीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील नद्यांमधील जलपर्णी हटविता येईल का? याबाबत अभ्यास करावा. अशी सूचना ८ मार्च २०२२ रोजी विधानसभेत केली होती. तत्कालीन नगरविकासमंत्री मंत्री एकनाथ शिंदे यांनी या सूचनेचा अभ्यास करुन मुळा-मुठा नदीत तोच प्रयोग करावा, असे निर्देश दिले होते. अद्यापी यावर कार्यवाही झालेली दिसत नाही, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.



पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावित्रीबाई पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी आणि मुळा-मुठा नदीतील जलपर्णी याबाबत सूचनांची दखल घेऊन कार्यवाही सुरू करावी, अशी विनंती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बैठकीत केली.



