जालन्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण

जालना : अंतरवाली सराटी गावात मराठा आक्रोश मोर्चाचं आरक्षणासाठी उपोषण सुरू असताना आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर तिथून चार किलोमीटर अंतरावर आंदोलकांनी दोन बस पेटवल्या आहेत. तसेच काही वाहनांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला. एक खासगी आणि राज्य परिवहन महामंडळाची एक बस आंदोलकांनी पेटवली. आंदोलकांकडून झालेल्या दगडफेकीत १० ते १२ पोलिस जखमी झाले आहेत.

“मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणारं सरकार आम्हाला नको”, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे.






गेल्या २९ ऑगस्टपासून मराठा मार्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. पण त्याला विरोध झाल्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तर आंदोलकांनी दगडफेक केली गेली. त्यानंतर आक्रमक आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. पोलिसांनी काल रात्रीच आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो हाणून पाडण्यात आला होता.






