बारामतीला लीड मिळणार की नाही बारामतीकर सांगतील- अजित पवार, मोठ्या शक्ती प्रदर्शनाने सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यानंतर त्यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा सुद्धा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा भावनिकतेला बळी पडू नका, असे आवाहन करत अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवर तोफ डागली.
पुणे येथील जिल्हा परिषदेशेजारी पार पडलेल्या या जाहीर सभेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, खा. मेधा कुलकर्णी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, आ. भीमरावअण्णा तापकीर, आ. दत्तामामा भरणे, आ. राहुल कुल, आ. माधुरी मिसाळ, आ. महेश लांडगे, आ. दिलीप मोहिते, आ. अतुल बेनके, आ. सुनील टिंगरे, आ. चेतन तुपे, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, माजी आमदार रमेशआप्पा थोरात, शरद ढमाले, अशोक टेकावडे, योगेश टिळेकर, माजी खासदार प्रदीप रावत उपस्थित होते.
कोणत्याही भावनिकतेला बळी पडू नका. खोट्या प्रचाराला बळी पडू नका, बारामतीला लीड मिळणार की नाही ते बारामतीकर सांगतील अशा शब्दात अजित पवार यांनी दंड थोपटले. अजित पवार यांनी जाहीर सभेला संबोधित करताना बारामती तालुक्यामध्ये केलेल्या जोडण्यांमुळे वाढलेल्या ताकदीचा उल्लेख केला. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील, दौंडमधून राहुल कुल तसेच विजय शिवतारे यांच्यासोबत केलेला जोडण्यांचा आणि मतदारसंघातील प्रमुख नेत्यांचा उल्लेख केला.
मित्र कसा असावा आणि विरोध कसा असावा याचे उदाहरण विजय शिवतारे असल्याचेही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले. अजित पवार यांनी सांगितले की ही निवडणूक गावकी आणि भावकीची नाही, तर देशाची निवडणूक आहे. त्यामुळे देश नेमका कोणाच्या हातात द्यायचा याचा विचार करावा लागणार आहे. आज फक्त सुनेत्रा पवार अर्ज भरणार आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील, मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे यांचा नंतर अर्ज भरला जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. ते पुढे म्हणाले की मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अजित पवार यांनी या भाषणा बारामतीची लढाई पवार विरुद्ध पवार अशीच होणार असली, तरी पवार विरुद्ध पवार नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगण्याच प्रयत्न केला. ते पुढे म्हणाले, की काही लोक निवडणूक भावनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत. बनवाबनवीचे काम होत असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी, सुनेत्रा पवार यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं. सुनेत्रा पवार यांनी मनोगत व्यक्त करताना बारामतीच्या विकासाचे संपूर्ण क्रेडिट अजित पवाराना दिले. त्या म्हणाल्या, की बारामतीमध्ये विकास काम झालं आहे त्यामध्ये अजित पवारांचे कष्ट आहेत. घड्याळाला मत म्हणजेच मोदींना मत असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.










