भाजपवर रोष नाही, फडणवीसांमुळे पक्षाला रामराम, एकनाथ खडसेंचा अखेर राजीनामा ; भाजपचे १०-१२ आमदार राष्ट्रवादीत येणार – जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

मुंबई : “माझा भाजपवर रोष नाही, कोणत्याही केंद्रीय नेत्यावर टीका नाही. मी फक्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडत आहे,” असे मत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. यामुळे खडसे यांच्या राजीनामा नाट्यावर अखेर पडदा पडला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन खडसेंच्या भाजपमधील राजकीय भूकंपाची घोषणा केली.

एकनाथ खडसे यांनी आज सकाळी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. खडसे म्हणाले, “आज मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेले 40 वर्ष भाजपचं काम करत होतो. या 40 वर्षात अनेक प्रसंग आले. भाजप खेड्यापाड्यात पोहोचलेली नव्हती. भाजप उपेक्षित होती, त्यावेळपासून आजतागायत भाजप पक्षाचं काम प्रामाणिकपणे करत आलो. भाजपने देखील या कालखंडात मला मोठ्या प्रमाणात राजकारणात अनेक पदं दिले. ते मी नाकारु शकत नाही. भाजपबद्दल माझ्या मनात कोणताही रोष नाही. मी भाजपच्या कोणत्या केंद्रीय नेत्यावर किंवा पक्षावर टीका केली नाही,” असे एकनाथ खडसेंनी सांगितले.
“मधल्या कालखंडात मुख्यमंत्री होण्याचं ज्यावेळेला म्हटलं, बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे त्यानंतरच्या काळात जे काही घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. माझ्या अनेक चौकश्या झाल्या, भूखंड हडप करण्याचे आरोप झाले, माझ्यावर खोट्या विनयभंगाचा खटलादेखील दाखल करण्यात आला. दमानिया यांनी त्यांचा विनयभंग केल्याचा खोटो खटला दाखल केला. पोलीस त्यावेळी तयार नव्हते. दमानिया यांनी पोलीस स्टेशनला रात्रभर गोंधळ घातला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करायला सांगितला. वास्तविक अशा स्वरुपाचे खोटे गुन्हे नोंद करायला सांगणं चुकीचं आहे. या खटल्यातून मी नुकतंच 15 दिवसापूर्वी बाहेर आलो. छळ किती करावा याला काही मर्यादा राहिल्या नव्हत्या. तरीही इतके दिवस मी सहन करत आलो.”
“ज्या कालखंडात माझ्यावर आरोप झाले तेव्हा कोणत्याही राजकीय पक्षाने माझ्या राजीनाम्याची मागणी केलेली नव्हती. माझ्या चौकशी निमित्त माझा राजीनामा घेतला गेला.”
खडसे म्हणाले,“मी पक्षासाठी माझं संपूर्ण आयुष्य घालवलं. ते मी त्या कालखंडात घालवलं जेव्हा दगडं, धोंडे खाल्ले, लोकं थुंकली, मारलं, वाळीत टाकलं गेलं, अशा कालखंडातून आम्ही काम केलं. पक्षासाठी 40 वर्ष आम्ही काम केलं. आजही माझी भाजपशी कोणतीही तक्रार नाही. माझी तक्रार मी वारंवार बोलून दाखवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे विनयभंगाचा खटला दाखल केला, भूखंडाचा चौकश्या लावल्या. मी सगळ्यांमधून सुटलो. पण त्याचा प्रचंड मनस्ताप झाला.”
“एखाद्या व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणं, कोर्टामध्ये खटला चालणं, यापेक्षा मरणं आहे. खटला दाखल करण्यासाठी गोंधळ केला म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सांगणं. मी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की, ती मुंबईत मी मुक्ताईनगर तेव्हा नाईलाजास्तव गुन्हा दाखल केला, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. नियमानुसार, कायद्यानुसार काम करा, असं त्यावेळेस सांगता आलं असतं. मला खूप बदनामी सहन करावी लागली.”
“तरीही त्यानंतर मी 4 वर्ष काढलं. माझ्या कथित पीएवर त्यांनी 9 महिने पाळत ठेवली. तु्म्ही आमच्यावर पाळत ठेवत होते. आयुष्यात मला काय मिळालं नाही मिळालं याचं दु:ख नाही. पण मनस्ताप झाला याचं जास्त दु:ख आहे. मी जे काही पद मिळवलं ते माझ्या ताकदीवर झालं.” असे एकनाथ खडसे म्हणाले.















