समाज जडणघडणीमध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या ज्येष्ठ मंडळींचा सन्मान करणे म्हणजे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे : ह.भ.प माऊली जंगले महाराज

लोकमंगल प्रतिष्ठानच्या वतीने ॲड. विजयराव झोळ यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
पुणे : समाज जडणघडणीमध्ये ज्यांनी मोलाचे कार्य केले अशा ज्येष्ठ मंडळींचा सन्मान करणे म्हणजे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे असते. लोकमंगल प्रतिष्ठानने ॲड. विजयराव झोळ यांना दिलेला जीवनगौरव पुरस्कार म्हणजे त्यांच्याप्रती समाजाने व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे. समाजाची प्रगती आणि समतोल अशा सद् गुणी माणसांमुळेच साधला जात आहे. ही महाराष्ट्रची परंपरा आहे. असे उद्गार ह.भ.प माऊली जंगले महाराज यांनी काढले.
लोकमंगल प्रतिष्ठान पुणेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महासंघ (मार्ट )चे सचिव ॲड. विजयराव मल्हारराव झोळ यांना ह.भ.प. माऊली जनार्दन जंगले महाराज यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लोकमंगल प्रतिष्ठान तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महासंघ (मार्ट) चे अध्यक्ष बाळासाहेब बराटे, क्षत्रिय मराठा दिंडी क्रमांक ९७ चे विश्वस्त माणिक दुधाने, निवृत्त जिल्हा सरकारी वकील ॲड. निकम, योगाचार्य अनंतराव झांबरे, सोलापूर वानप्रस्थ कृषी पर्यटन केंद्राचे संचालक सुधीर जाधव, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, लोकमंगल प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र ननावरे, राजाभाऊ गिजरे, कृषीभूषण बाळासाहेब चव्हाण, ॲड. चेतन झोळ तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातून कृषी पर्यटन केंद्र चालक, शेतकरी उपस्थित होते.

यावेळी बोलताना लोकमंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे म्हणाले, ॲड. विजयराव झोळ म्हणजे शेतकऱ्यांविषयी प्रचंड तळमळ आणि कळवळा असणारं व्यक्तिमत्व. शेतकऱ्यांची शेतीची अवस्था बघून त्यांचं संवेदनशील मन कायम व्यथित व्हायचं. अनेक वेळा बोलताना चर्चेतून शेतकऱ्यांविषयी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ दिसून यायची. मिटकॉन ने घेतलेल्या शासनाच्या कृषी पर्यटन संदर्भातील कार्यशाळेत आमची पहिली भेट झाली तिथून पुढे आमची मैत्री झाली. 2009 मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महासंघाची स्थापना झाली. या कृषी पर्यटन महासंघाचा विस्तार करण्याचा विचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्यानंतर आमच्या दोघांची नावे पुढे आली. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्या झोळ साहेबांनी ही जबाबदारी स्वीकारली व मी महासंघाचा अध्यक्ष व ते सचिव म्हणून काम पाहू लागलो.
हे काम करत असताना वयाने आणि अनुभवाने ते मोठे असले तरी त्यांनी ते कधी जाणवू दिले नाही. पोलिस खात्यात काम करत असताना त्यांनी वकिलीची शिक्षण पूर्ण केले. बांगलादेश युद्धात त्यांची बिनतारी संदेश यंत्रणेत त्यांची पोलिस खात्यातून नेमणूक करण्यात आली होती. वाचनाची आवड असल्यामुळे त्यांचा विविध क्षेत्राविषयी प्रचंड अभ्यास आहे.
पुढे बराटे म्हणाले, कृषी पर्यटना विषयी काम करत असताना शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या होत्या, त्या आम्ही आमच्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला. कृषी पर्यटनासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवले. त्या कार्यक्रमात माझ्यापेक्षा जास्त वेळ त्यांनी दिला. शिबिर यशस्वी पार पडण्यासाठी ते प्रयत्नशील असत, त्याचा असा फायदा झाला की कृषी पर्यटनाबाबतीत सूक्ष्म व तांत्रिक गोष्टी आम्हाला कळाल्या. यातून एक कृषी पर्यटनासंदर्भात अभ्यासक्रम तयार केला गेला. त्यात त्यांचा मोठा वाटा होता. या केलेल्या कामाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला राज्याच्या अनेक भागात कृषी आणि ग्रामीण पर्यटनाकडे युवक वर्ग आकर्षित झाला. व्यवसाय म्हणून कृषी पर्यटनाकडे पाहिलं जाऊ लागलं. त्यातून अनेक शेतकरी नावारूपाला आले. अभ्यास, वाचन, चिंतन आणि त्यानंतरच व्यक्त होणे हा झोळ साहेबांच्या स्वभावातील महत्त्वाचा पैलू आहे. निवृत्ती नंतरही ते स्थिर झाले नाहीत त्यांच्याकडे असणारी ऊर्जा ही आवाक करणारी आहे. त्यांना पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मरळ यांनी केले. रवी ननवरे यांनी स्वागत केले. तर आभार प्रदर्शन राजाभाऊ गिजरे यांनी केले.


