महाराष्ट्राला अधिक लस, रेमडेसिविरचा पुरवठा करावा-डॉ.नीलम गोऱ्हे यांची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

पुणे : देशातील कोरोनाची वाढती परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष, मा.श्री. ओम बीर्ला यांनी देशातील सर्व विधानमंडळाचे सभापती, अध्यक्ष, उप सभापती यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. त्यावेळी महाराष्ट्र विधानपरिषद डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्राला अधिक लस, रेमडेसिविर औषधांचा पुरवठा करण्याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना केंद्र सरकारला सूचना करण्याची विनंती केली.
याप्रसंगी पुढे बोलतांना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राज्य सरकारने कोवीड परिस्थितीत असंघटीत कामगारांना अनुदान देणे, अन्न सुरक्षा योजनेखाली तीन किलो गहु व दोन किलो तांदुळ मोफत देणे, जंबो कोवीड सेंटर चालविणे, तसेच लसीकरणामध्ये महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे नमुद केले. महाराष्ट्र राज्याने परिवहन व्यवस्था सुरळीत ठेवल्याने लॉकडाऊन नंतरही गैरसोय झाली नसल्याचे सांगितले.

तसेच निती आयोगाचे माध्यमातून या राष्ट्रीय आपत्तीमध्ये अधिक निधी देण्याबाबत विनंती केली. तसेच राज्याचे प्रलंबित जीएसटीचे पैसे तात्काळ देण्याची विनंती लोकसभा अध्यक्षांना केली. यावेळी लोकसभा व राज्यसभा चँनल वर कोरोना मधून बरे झालेल्या रुग्णांची माहिती दिल्यास लोकामध्ये सकारात्मक संदेश जाईल अशी सुचना डॉ. गोर्हे यांनी केली. बिर्ला यांनी या सुचनेचे स्वागत केले व त्या नुसार प्रसारण करण्याबाबत संबंधिताना निर्देश दिले.
या बैठकीला उपअध्यक्ष नरहरि झिरवाळ, मंत्री अनिल परब हे या बैठकीस उपस्थित होते. त्यांनी राज्य शासनाच्या विविध प्रयत्नांबाबत व योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच बैठकीस प्रविण दरेकर, आणि सचिव महाराष्ट्र विधानमंडळ ,अध्यक्ष पंजाब, मेघालय, अंध्रप्रदेश, नागालँड, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक हे सुध्दा उपस्थित होते.



