अधिवेशनाला सुरुवात; राज्यपालांना दोन मिनिटांत भाषण गुंडाळावं लागलं

मुंबई : (Maharashtra budget session 2022) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या त्या विधानाचा निषेध करण्यासाठी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी दोन मिनिटांत भाषण गुंडाळावं लागलं आहे.

नेहमीच्या पद्धतीनुसार राज्यपाल विधिमंडळात दाखल झाल्यानंतर त्यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होते. मात्र, राज्यपालांनी अभिभाषणाला सुरुवात करताच आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. सत्ताधारी आमदारांच्या घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी आपलं भाषण अवघ्या दोन मिनिटांत गुंडाळलं आणि ते निघून गेले. “राज्यपालांना परत पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यावर विचार सुरू आहे”, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे.



आदित्य ठाकरे यांनी घडलेल्या प्रकारावरून खंत व्यक्त केली आहे. “ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. हा महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. राज्यपालांनी असं निघून जाणे, त्यांच्या भाषणावेळी त्यांचा अपमान होणे हे सर्व अयोग्य आहे. आम्हाला या गोष्टींमुळे धक्का बसला आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.



