अटलजींची स्वप्नं पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी साकारली : देवेंद्र फडणवीस

संस्कृती प्रतिष्ठान आयोजित अटल संस्कृती गौरव पुस्कार प्रदान
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, तेव्हा तुमच्या किमान समान कार्यक्रमात राम मंदिर आणि कलम ३७० चा समावेश का नाही, असे विरोधक डिवचण्याच्या हेतूने विचारत. परंतु, हा २२ पक्षांच्या सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे. माझ्या पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल तेव्हा राम मंदिरही बनेल आणि कलम ३७० ही रद्द होईल, असे अटलजी सांगत. द्रष्ट्या अटलजींची ही स्वप्नं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकारली आहेत, असे म्हणत अटलजींच्या द्रष्ट्यापणाचा गौरव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
संस्कृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या अटल संस्कृती गौरव पुस्काराने जेष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे आणि उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी यांना फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रकाश जावडेकर,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, कार्यक्रमाचे आयोजक माजी महापौर आणि संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ उपस्थित
होते.

फडणवीस म्हणाले, अटलजींनी ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली. गावे एकमेकांना जोडली आणि खऱ्या अर्थाने नवभारताची सुरुवात केली. ज्यांना अटलजींच्या नावाने पुरस्कार मिळत आहे त्या व्यक्ती त्या उंचीच्या आहेत. आपापल्या क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. प्रभाताईंनी संगीताची सेवा करताना भारतीय शास्त्रीय संगीत जनमाणसात रुजविले तसेच नव्या गायक-गायिकांना घडविण्याचे कार्य केले. अटलजींनी इथेनॉलचे महत्त्व सर्वप्रथम ओळखले आणि सर्वप्रथम भारताचे इथेनॉल, बायोफ्युएल धोरण तयार केले. धोरणाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्याचे काम डॉ प्रमोद चौधरी यांच्या उद्योगाने केले. त्याचा देशाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.



राम मंदिरावरून देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला
अयोध्येतील श्रीराम मंदिर तुमची खासगी मालमत्ता आहे का ? असे काही जण विचारत आहेत. हे तेच आहेत, जे मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे, असे म्हणत होते. त्यांना मला सांगायचे आहे की, तुमच्या छाताडावर बसून मंदिर बनवले, तारीखही सांगितली. हिंमत असेल तर २२ जानेवारीला अयोध्येत या, श्रीराम मंदिर काय आहे, ते तुम्हाला दाखवू, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, अटलजींच पुण्याशी एक नातं होत. अनेक सभा त्यांच्या पुण्यात गाजल्या. पुण्याच्या वसंत व्याख्यान मालेत अटलजी येऊन गेले होते. सवाई गंधर्व महोत्सवात त्यांची उपस्थिती होती. गीत रामायणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ही अटलजी पुण्यात आले होते. ते पुण्याबद्दल चांगले बोलायचे, त्यांना पुणे आवडायचं म्हणूनच अटलजींच्या सर्व आठवणी ते गेल्यानंतर यानिमित्ताने जतन करता याव्यात यासाठी त्यांच्या नावाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. अटलजी ज्या ज्या क्षेत्रात जगले, ज्या ज्या क्षेत्रात त्यांचा सहभाग होता त्या क्षेत्रातील दिग्गज मंडळींना आपण सन्मानित करावं का असा विचार करून या पुरस्काराची निर्मिती झाली.






