अहिराणी गायक नवल माळी यांचे निधन

जळगाव : प्रसिद्ध अहिराणी गायक नवल माळी (वय 48) यांचं निधन झाले आहे. माळी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनामुळे अहिराणी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. माळी हे गेल्या 25 वर्षापासून अहिराणी संगीत क्षेत्रामध्ये अत्यंत लोकप्रिय असे गायक कलाकार होते. गुजरातमधील अहमदाबाद, सूरत आणि बडोदा शहरात त्यांच्या गीताच्या कॅसेट विक्रीने उच्चांक गाठला होता.
नवल माळी यांचं ‘साली नंबर 1’ हे अहिराणी गीत प्रचंड गाजलं. धरणगाव तालुक्यातील वंजारी खपाट येथील ते रहिवासी होते. सालीस दिलवाली, परदेश नी मैना, मामानी पोर त्यांची ही गाणीही लोकप्रिय ठरली. त्यांनी शेकडो अहिराणी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली. अहिराणी चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले ज्येष्ठ संगीतकार विश्राम (आप्पासाहेब) बिरारी यांनी ”नवल माळी यांची परिस्थिती खूप नाजूक होती. प्रचंड अहिराणीतलं काम असूनही अहिराणी कलावंतांची झोळी खाली असते याचे जीवंत उदाहरण म्हणजे नवल माळी”, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.




