आवाज उद्धव ठाकरेंचाच; शिवसेना फुटीनंतरच पहिलं यश, सोलापूरच्या चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाचा झेंडा

सोलापूर : शिंदे गटासोबत संघर्ष सुरु असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पहिलं यश मिळालं आहे. सोलापूरमधील चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला आहे. ठाकरे गटाने चिंचपूर ग्रामपंचायतीमधील सर्व सात जागा जिंकल्या आहेत. ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकल्याने ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालाने सोलापुरात वर्चस्व असणारे माजी सहकारमंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सकाळी ९.३० वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून सर्वात प्रथम चिंचपूर ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या गटाने सातपैकी सर्व सात जागा जिंकत भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाला धक्का दिला आहे. माजी आमदार रविकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे सत्ता गेली आहे.







