देशातील कोरोनाचे निर्बंध 31 मार्चपासून शिथील करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून देशवासियांना भयानक अशा लॉकडाऊनला सामोरे जावे लागले आहे. कोरोनाच्या तीन लाटांचा सामना केल्यानंतर आता केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी घातलेले सर्व निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला असून केंद्रीय गृह मंत्रालयाने तसे आदेश जारी केले आहेत. मात्र 31 मार्चपासून देशातील हे निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. मात्र असे असले तरी नागरिकांनी दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर राखून मास्क घालावा असे आवाहन करण्यात आले असून या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,778 नवे रुग्ण सापडले असून 62 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये कमालीची घट झाली आहे.मृत्यूची संख्या कमी झालेली असली तरी रुग्णांच्या मानाने ती खूप जास्त आहे. दरम्यान कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने केंद्र सरकारने डिजास्टर मॅनेजमेंट कायदा हटविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाचे रुग्ण वाढू लागले तर पुन्हा लावण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने , एनडीएमए कोरोना प्रतिबंधात्मक उपायांसाठी डीएम कायदा लागू करणारा आदेश मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांच्या पत्रात, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना डीएम कायद्यांतर्गत जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे काढून टाकण्यास सांगितले आहे.




