राज्यात आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओमिक्रॉनचे संकटही आणखी वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. संपूर्ण राज्यात यासाठी खास नियोजन करण्यात आले आहे.
मुलांच्या लसीकरणासाठी कोवीनवर नाव नोंदणी करता येते. तसेच ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊनही लस देण्याची सुविधा करण्यात आली आहे. पुण्यासह पूर्ण राज्यात 15 ते 18 वर्षे या वयोगटातील मुलांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे उद्दीष्ट सरकारने समोर ठेवले आहे.
आधारकार्ड नसेल तर शाळेतील ओळखपत्राच्या मदतीने लसीसाठी नाव नोंदवता येणार आहे. ज्या मुलांचा जन्म 2007 साली किंवा त्यापूर्वी झालेला आहे, ही मुलं लस घेण्यास पात्र आहेत. 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना लस दिली जाणार नाही. मुलांकडे शाळेचे ओळखपत्र किंवा आधारकार्ड असणे अनिवार्य आहे.




