नोटिसा देऊन नागरिकांना घाबरणे हा कोणता जनजागृतीचा प्रकार ; दिपाली धुमाळ

पुणे : एल अँड टी L&T कंपनीकडून करण्यात आलेली अर्धवट कामे, मीटर बसवताना करण्यात आलेली तोडफोड व नागरिकांना देण्यात आलेली चुकीची माहिती व आता अचानक पाणी वापराबाबत दिलेल्या नोटीसीत देण्यात आलेला कारवाईचा इशारा यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने अशा चुकीच्या नोटिसा देऊन नागरिकांची दिशाभूल करू नये अन्यथा नागरिकांना घेऊन आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल असा इशारा विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ Deepali Dhumal यांनी दिला आहे.
धुमाळ यांनी सांगितले की, पुणे शहरामध्ये पाणीपुरवठा विभाग मार्फत नागरिकांसाठी समान पाणी पुरवठा योजने अंतर्गत एलएनटी कंपनी मार्फत अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या व पाईप लाईनचे काम सुरु आहे. मध्यंतरी प्रशासन व एलएनटी अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने नागरिकांच्या घरोघरी जाऊन नळ कनेक्शनला पाण्याचे मीटर बसविले होते. सदर मीटर बसवताना झालेले तोडफोड, लिकेज व नुकसान तसेच काम अपूर्ण सोडून मीटर बसविण्यात आले. त्यावेळी नागरिकांना सांगण्यात आले कि हे मीटर लवकर सुरु होणार नाही व याचे कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा बिल येणार नाही अशी नागरिकांची खोटी समजुत काढण्यात आली.

परंतु आता पाणीपुरवठा विभागा मार्फत नागरिकांना नोटीसा येऊ लागल्या आहेत. या नोटीसीत कोणत्याही प्रकारची मीटर रिडिंग न घेता किंवा त्या ठिकाणी न जाता सदर कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत किंवा खरच पाण्याचा वापर तेवढ्या प्रमाणात होत आहे का अशी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अंदाजे आकडे टाकून नोटीसा दिल्या आहेत. सदर कुटुंबात २ व्यक्ती असेल तर त्या कुटुंबात ५ ते ६ व्यक्ती आहेत अशी खोटी आकडेवारी नमुद करून त्या कुटुंबाला नोटीसा दिल्या आहेत.



नोटीस दिलेल्या तारखेपासून १५ दिवसाच्या कालावधी नंतर पाणीपुरवठा विभाग द्वारे कारवाई करण्यात येईल.केवळ नोटीसा देऊन नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे. या प्रकाराबाबत आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा चौकशी केली त्यावेळी अधिकाऱ्यांद्वारे असे सांगण्यात आले कि या नोटीसा फक्त नागरिकांमध्ये पाण्याच्या नियमित वापराबाबत जनजागृती करण्यासाठी दिल्या जात आहेत. परंतु लोकांना नोटिसा देऊन घाबरणे हा कोणता जनजागृतीचा प्रकार असा प्रश्न धुमाळ यांनी उपस्थित केला आहे.



नोटिसा देऊन नागरिकांमध्ये भीती दायक वातावरण निर्माण करण्याऐवजी याबाबत, जाहिरात, पत्रके यामाध्यमातून जनजागृती करणे आवश्यक होते. मात्र नागरिकांना भीती दाखवून प्रशासनाला कसला आनंद मिळत आहे समजत नाही. पालिका आयुक्तांनी या प्रकारात लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत की, अशा प्रकारच्या नोटीसा देऊन नागरिकांची दिशाभूल करू नये व या नोटीसा देणे थांबवावे अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.



