राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ८ खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला जाणार ; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा.. सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेनंतरही

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ८ खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सोमवारी भेट होणार आहे. सकाळी ११ वाजता ही भेट होणार असल्याची माहिती पक्षाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या भेटीचे कारण विकासकामांशी संबंधित प्रश्न असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले असले, तरी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आठ खासदार पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील सध्याची पाणीटंचाईची परिस्थिती, तसेच विकासाच्या चौकटीतील विविध प्रश्नांवर या भेटीत चर्चा होणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.
“महाराष्ट्रात सध्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विकासाच्या दृष्टीने आमच्या खासदारांचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत,” अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.



मात्र, या भेटीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांनाही वेग आला आहे. नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या खासदारांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आठ खासदार मोदींची भेट घेणार असल्याने या भेटीकडे राजकीयदृष्ट्याही पाहिले जात आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी प्रस्तावित डिलिमिटेशन बिलावरही भाष्य केले. “डिलिमिटेशनचं बिल अद्याप आलेलं नाही. आमची दररोज सकाळी इंडिया अलायन्सची बैठक होते. चर्चा करूनच आम्ही भूमिका घेतो,” असे सुळे यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे सोमवारी होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आठ खासदारांची भेट नेमकी कोणत्या दिशेने जाते, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



