सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या अॅड गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना मुंबईच्या किला कोर्टात हजर करण्यात आलं. महेश वासनीस यांनी सदावर्तेंची बाजू मांडली. (ST Worker Strike) सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावताना इतर 109 जणांना मात्र 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सरकारी वकिलांनी सुनावणीदरम्यान म्हटलं होतं की, वकील गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची पोलिस कोठडी द्या, आरोपीवरील कलम गंभीर आहेत. त्यांनी कामगारांना भडकावलं. आरोपांची संख्या मोठी असल्यानं त्यांची चौकशी कशी करणार? असं न्यायाधीशांनी म्हटलं. त्यावर बोलताना सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं की, सीसीटीव्ही फुटेजेस आहेत. आरोपी क्रमांक 1 सदावर्ते हेच यामागे एकटे नसून अजून काही जण त्यांच्यासोबत असणार म्हणून आम्हाला चौकशी करायची आहे. कोण कोण ॲक्टिव्हली यात इन्व्हॉल होतं यासंबंधी चौकशी करायची आहे. सदावर्ते यांच्या भाषणामुळे कामगारांनी हे कृत्य केलंय. पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आलाय. दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आलीय. दोन जण जखमी झालेत. रक्ताचे नमूने घेतले आहेत. दारु पिऊन कामगार होते अशी शंका होती. काही जण आपलं नाव खोटं सांगतायत, सोबत पत्ता देखील सांगत नाही आहेत. यासाठी देखील चौकशी करायची आहे. ते खरंच एसटी कामगार आहेत की भाडोत्री होते. हे देखील चेक करायचंय. आज पहिली रिमांड आहे त्यामुळे या बेसिक गोष्टी माहिती हव्यात त्यामुळे रिमांडची मागणी करतो, असं घरत यांनी म्हटलं.
काय म्हणाले सदावर्तेंचे वकील?
सरकारने कामगारांबाबत योग्य भूमिका नव्हती. पहिल्या दिवसांपासून कामगारांच्या मागण्या ऐकून घेतल्या जात नव्हत्या. कित्येक कामगारांनी आत्महत्या केली. मात्र सरकारने त्यांची दखलही घेतली नाही. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका कायम सरकारच्या विरोधात राहिली आहे. हायकोर्टात सदावर्तेंवर हल्लाही झाला आहे. सदावर्ते हे एक प्रसिद्ध वकील आहेत. सदावर्तेंकडे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्याही केसस आहेत. न्यायालयाचा निकाल 7 तारखेला आला. त्यावेळी गुणरत्न सदावर्तेंनी आक्षेपार्ह भाषण केले असे जबाबात म्हटलं आहे. मात्र गुन्ह्यातील जबाबात वापरलेले शब्द आणि प्रत्यक्षात गुणरत्न यांनी म्हटलेलं वाक्य यात तफावत आहे. गुन्ह्यात शरद पवारांच्या बंगल्यात घुसण्याची भाषा केली आहे. मात्र मुलाखतीत तसे शब्दच वापरलेले नाहीत, असा युक्तीवाद गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांमार्फत करण्यात आला.
कामगार शांततेत आंदोलन करत होते. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना परवानगी दिली होती. जयश्री पाटील यांनीही 100 कोटी वसूली मलबार हिल प्रकरणात तक्रार दाखल केली असून याचिकाही दाखल केलीय. याचच कुठेतरी रोष या कारवाईतून दिसतोय. म्हणूनच अटकेची कारवाई करण्यापूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. आम्ही कामगारांची बाजू कोर्टात मांडली. सरकारला कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. म्हणून रोषातून सरकार कृत्य करत आहे, असं सदावर्तेंचे वकील म्हणाले.







