राज ठाकरेंनी पुनर्विचार करावा : आनंद दवे

पुणे : नमाज एका मर्यादेपर्यंत किंवा दिवसापुरते मर्यादित असते. मात्र आपले सण वर्षभर होत असतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपली वक्तव्ये पाहून त्याचा पुनर्विचार व्हावा, असे हिंदू महासभेचे आनंद दवे (Anand Dave) यांचे म्हणणे आहे.
राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्यासंबंधीची भूमिका मांडली आहे. भोंग्यांचा विषय सामाजिक असून मशिदींवरचे आणि सर्वच ठिकाणांवरचे भोंगे उतरवलेच पाहिजेत, असे ते म्हणाले होते. एवढेच नाही, तर आधी मशिदींवरचे भोंगे उतरवा नंतर मंदिरावरचे उतरवू, अशी भूमिका त्यांनी मांडली होती, त्यावर आनंद दवे यांनी आपले मत मांडले आहे. भोंगे उतरवण्याने सर्वाधिक नुकसान हिंदुत्वाचे (Hindutva) होईल, असे ते म्हणाले आहेत.
प्रत्येक गावाची जत्रा, उरूस, ग्रामदैवत यात्रा, गणपतीची मिरवणूक यासहित 12 दिवस, नवरात्रीचे 10, शिवजयंती, संभाजी महाराज जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, प्रत्येक जातीच्या युगपुरुषांचे दिवस, त्यासंबंधीच्या यात्रा, पाडवा यात्रा, दिवाळी पहाट, दहीहंडी हे सगळेच संकटात येईल, असे दवे म्हणाले. रस्त्यावर नमाज पठण चूकच मग गणपती मंदिर, मांडव, उत्सव, मांडवातील आरती त्याचबरोबर रस्त्यावरील मिरवणूक, दांडिया यांचे काय करणार, असा सवाल त्यांनी केला आहे.




