उष्माघाताने राज्यात 25 जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात यंदा उष्माघात अनेकांच्या जिवावर बेतला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये उष्माघाताच्या ४०१ रुग्णांची नोंद झाली असून, संशयित मृत्यूंमध्ये २५ जणांचा समावेश आहे. पुण्यामध्ये २० रुग्णांना उष्माघाताचा त्रास झाला आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये मार्चपासून तापमानात वाढ सुरू झाली. १ मार्च ते १ मे या कालावधीतील ही आकडेवारी असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. देशात सर्वसाधारणपणे पठारी भागांमध्ये ४० अंश सेल्सिअस, किनारपट्टीलगतच्या भागामध्ये ३७ अंश सेल्सिअस; तर डोंगराळ भागात ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्यास त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात. वातावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळे सध्या तापमान वाढते आहे, याकडे आरोग्य विभागने लक्ष वेधले आहे. आरोग्य विभागाने ही हळुवार येणारी आपत्ती (सायलेंट डिझास्टर) असल्याचे म्हटले आहे.
वातावरणाचे तापमान ३७ अंश सेल्सिअस असते, तोपर्यंत त्याचा त्रास होत नाही. मात्र, त्यानंतर शरीर वातावरणातील उष्मा शोषून घेऊ लागते. त्याचे परिणाम शरीरावर होतात. तापमान आणि आर्द्रता यांचा मिळून होणारा परिणाम अधिक असतो. प्रत्यक्ष तापमान ३४ अंश सेल्सिअस असेल, पण आर्द्रता ७५ टक्के असेल, तर तापमान निर्देशांक ४९ अंश सेल्सिअस इतका असतो. म्हणजे व्यक्तीला तापमान ४९ अंश सेल्सिअस इतके त्रासदायक ठरते, याकडे आरोग्ययंत्रणेने लक्ष वेधले आहे.




