मराठी कलाकारांना चित्रपटात घेण्याचे रोहित शेट्टीने सांगितलं ‘हे’ कारण, म्हणाला महाराष्ट्र…

मुंबई : ‘सर्कस’ हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाच्या टीमने नुकतीच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमध्येही हजेरी लावली होती. त्यावेळी महाराष्ट्र, मराठी माणूस आणि कलाकारांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर व अश्विनी काळसेकर हे मराठी कलाकारही झळकले आहेत. रोहितच्या अनेक चित्रपटांत मराठी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळतात. मराठी कलाकारांना चित्रपटात कास्ट करण्यामागचं खरं कारण रोहितने हास्यजत्रेत सांगितलं.
रोहित शेट्टी म्हणाला, “तुझ्या चित्रपटात तू मराठी कलाकारांना का घेतोस, असा प्रश्न मला अनेक जण विचारतात. यामागे काहीतरी कारण आहे. मराठी कलाकार हे साधे व प्रतिभावान आहेत. ते अहंकारी नसतात. उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे करणारे अनेक कलाकार आहेत. पण मराठी कलाकार कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेत काम करतात. याबरोबरच मला चित्रपटातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ६० टक्के वाटा हा महाराष्ट्रातून येतो.”
रोहित शेट्टी व रणवीर सिंगसह ‘सर्कस’ चित्रपटातील जॅकलिन फर्नांडिस, विजय पाटकर, वरुण शर्मा, अश्विनी काळसेकर, सिद्धार्थ जाधव या कलाकारांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.




