पुणे शहर

पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत केली ही मागणी..

ओबीसी वाद न होता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे

क्रिमिलेयर मर्यादेत 8 लाखांवरून 12 लाखांपर्यंत मर्यादा वाढविण्याची गरज

विधानसभेला केली 10 ते 12 जागांची मागणी

पुणे : लोकसभा निवडणुकीत रिपबल्किन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत, तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले, त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकीत किमान 10 ते 12 जागा आम्हाला मिळाव्यात, तसेच ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण न होता मराठ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा तसेच क्रिमिलेयरची मर्यादादेखील 8 लाखांवरुन 12 लाख रुपये करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

पुण्यात शासकीय विश्रागृहात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, राज्य संघटक परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव, महेंद्र कांबळे, आयूब शेख, श्रीकांत कदम, श्रमिक ब्रिगेडचे सतीश केदारी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  

Img 20240404 wa00162092919036315770776

पुढे बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, लोकसभेत आमच्या पक्षाला दोन जागा मिळणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही तरी नाराजी दूर ठेवून आम्ही कामाला लागलो. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन आरपीआयला एक एमएलसी मिळावी अशी विनंती केली होती. आगामी मंत्रीमंडळ विस्तारात आमचा समावेश व्हावा अशी आमची मागणी आहे, विधासभा निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाला 12 जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, राज्यस्तरावर आणि जिल्हा तसेच तालुकास्तरावर ज्या समित्या आहेत तिथे आम्हाला संधी मिळावी. महामडळांच्याही नियुकत्या कराव्यात अशी आमची मागणी आहे.

Img 20240404 wa00132425955639205292116

विधानसभेत महायुतीला 170 ते 200 जागा मिळतील असेही त्यांनी नमूद केले. संविधानाचा मुद्दा या निवडणूकीत चालणार नाही, लोकसभेच्या निवडणूकीत मात्र मोठा गैरसमज निर्माण करुन विरोधकांनी दलित आणि अल्पसंख्यांकमध्ये संभ्रम निर्माण करुन मते घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही.

ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, माझं दोन्ही समाजांना आवाहन आहे की, भांडण न करता आपला अधिकार मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, पण मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने पुन्हा विचार करावा. तामिळनाडूमध्ये 50 टकके  ओबीसीच्या दोन कॅटेगरी आहेत 30 टक्केचा एक आणि 20 टक्केचा दूसरा ग्रुप आहे, त्या पद्धतीने मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण देण्याचा प्रयत्न करावा. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, पण मराठ्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे. राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला तर आमचं मंत्रालय त्यावर विचार करेल, ज्या मराठ्यांचे उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे, त्यांनाच ते मिळेल, सर्वच ओबीसींनी देखील आरक्षण मिळत नाही ज्यांचे उत्पन्न 8 लाख आहे त्यांनाच मिळत आहे. 8 लाखांची मर्यादा 12 लाखांपर्यत वाढवावी अशी आमची मागणी आहे, त्याचा विचार भारत सरकारकडून सुरु आहे. 

Img 20240404 wa00127754739105663743070

यूपीतील हाथरस सत्संग प्रकरणावर बोलताना आठवले म्हणाले, की, मी परवा हाथरसला जाऊन आलो, हाथरसमध्ये 121 लोकांचे अंधश्रद्धेमुळे लोकांचे प्राण गेले. यात महिलांची संख्या मोठी आहे.त्यात दलित समाजाचे लोक जास्त आहेत, दलित समाज मोठ्या प्रमाणात त्या सत्संगाला जायचा. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील औरंगाबादचेही काही लोक सत्संगाला होते. ज्या कुटुंबातील लोकांचे जीव गेलेत त्या कुटुंबातील एकजणाला तरी नोकरी मिळावी यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिणार आहे असेही त्यांनी सांगितले, तसेच समाजाने अंधश्रद्धेमध्य न अडकता विज्ञानवादी दृष्टिकोन अवलंबवून आपली प्रगती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, त्यांनी चुकीची माहिती देऊन आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते अत्यंत गैर आहे. त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. त्यात जर त्या दोषी आढळल्या तर त्यांना पदावरुन हटविले पाहिजे,  छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखावरुन उद्भवलेल्या वादावरुन आठवले म्हणाले की, ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांची आहेत असे काही तज्ज्ञांचे मत आहे, यामुळे अशा प्रकारचा कोणताही वाद निर्माण होऊ नये.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये