नूतनीकरणासाठी पुन्हा बालगंधर्व बंद ठेवावे लागल्यास कलाकार आणखी अडचणीत सापडतील – अजित पवार

कलाकारांना कोरोना काळात खूप काही सहन करावं लागलं असल्याचं सांगत कलाकारांच्या मंडळाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
पुणे :बालगंधर्व रंगमंदिराच्या नूतनीकरणाबाबत मी महापौर आणि आयुक्तांना सूचना देणार आहे. याबाबत दोन मतप्रवाह आहेत, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, नाट्यगृहाचे नूतनीकरण करताना कलाकारांचा विचार करायला हवा. आधीच दीड वर्षे नाट्यगृहे बंद होती. त्यात नूतनीकरणासाठी पुन्हा बालगंधर्व बंद ठेवावे लागल्यास कलाकार आणखी अडचणीत सापडतील, असं पवार म्हणाले. कोल्हापूर आणि मुंबईतील चित्रपट सृष्टीत नवीन सुविधा देऊ, असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, काही लोकांचे प्रयत्न आहेत की बॉलीवूड महाराष्ट्रातून बाहेर घेऊन जायचं. त्यासाठी एका राज्याचे मुख्यमंत्री इथे आले देखील होते. तो त्यांचा अधिकार आहे. पण चित्रपटसृष्टी मुंबईतच राहावी अशी आपल्या सर्वांची अपेक्षा आहे आणि महाविकास आघाडी त्याच दिशेने प्रयत्न करेल, असंही पवार म्हणाले.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्यात आजपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह सुरु होत आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना महत्वाचं भाष्य केलं आहे. बालगंधर्व रंगमंदिरात नटराज पूजन झाल्यानंतर रंगमंचावर आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी म्हटलं की, दिवाळीनंतर देखील कोरोना रुग्णांची संख्या अशीच कमी होत राहिली तर नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना शंभर टक्के प्रेक्षक क्षमतेची परवानगी देण्यात येईल. कलाकारांना कोरोना काळात खूप काही सहन करावं लागलं असल्याचं सांगत कलाकारांच्या मंडळाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन ही अजित पवार यांनी दिले आहे.



