वडिलांची सेवा कशी करावी याचा आदर्श देणारा बावधनचा कीर्तन महोत्सव ; ह.भ.प.अनंत महाराज काळे

वडिलांच्या स्मरणार्थ घेतलेल्या बावधन मधील देदीप्यमान ठरलेल्या कीर्तन महोत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता..
बावधन : बावधनच्या कीर्तन महोत्सवातून तुम्ही काय घ्याल तर वडिलांची सेवा कशी करायची याचा आदर्श या कीर्तन महोत्सवातून तुम्ही घेतला पाहिजे. गेल्या सात दिवसापासून कै. ज्ञानोबा बाबुराव दगडे पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने सुरू असलेला हा महाराष्ट्रातील एकमेव असा कीर्तन महोत्सव आहे जो एकट्या माणसाने आपल्या बापाच्या प्रेमापोटी घेतला आहे. आपल्या वडिलांचा कृतज्ञता सोहळा करायचा म्हणून इतका भव्य दिव्य सप्ताह करणारा बापूसाहेब दगडे पाटील हा महाराष्ट्रातील पहिला माणूस आहे, प्रतिपादन ह.भ.प. अनंत महाराज काळे यांनी केले.

वडील कै. ज्ञानोबा बाबुराव दगडे पाटील यांच्या स्मरणार्थ बापूसाहेब दगडे पाटील यांनी घेतलेल्या आणि देदिप्यमान ठरलेल्या कीर्तन महोत्सवाची सांगता ह.भ.प. अनंत महाराज काळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या कीर्तन महोत्सवामुळे गेले सात दिवस बावधन परिसर विठू नामाच्या भक्ती सागरात नाहून निघाला आहे.



ह.भ.प. अनंत महाराज काळे यांनी कीर्तन रुपी सेवेसाठी आणि काल्याच्या कीर्तनासाठी देहू निवासी संत तुकोबाराय यांचा काल्याच्या प्रसंगाचा खलील अभंग घेत त्यातून प्रबोधन केले.
याल तर या रे लागें । अवघें माझ्या मागें मागें ॥१॥
आजि देतों पोटभरी । पुरे म्हणाल तोंवरी ॥२॥
हळूं हळूं चला । कोणी कोणाशीं न बोला ॥३॥
तुका म्हणे सांडा घाटे । तेणें नका भरुं पोटें ॥४॥
ह.भ.प. अनंत महाराज काळे यांनी आपल्या कीर्तनरुपी सेवेत भगवंत श्रीकृष्णाच्या जन्माच्या प्रसंगाचे वर्णन करत बापाचे महात्म्य सांगितले. कंसाची बहिण देवकी, तिचा विवाह, झालेली आकाशवाणी आणि श्रीकृष्ण जन्मानंतर वसुदेवाने यमुना पार करत बाळ कृष्णास कसे गोकुळात पोहचवले या प्रसंगाचे वर्णन त्यांनी केले.



ह.भ.प. अनंत महाराज काळे म्हणाले, ज्ञानोबा बाबुराव दगडे पाटील यांचा सुरुवातीचा काळ संघर्ष, संकट आणि गरिबीचा होता अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या तीन मुलांचा संभाळ करत त्यांना घडवलं. मुलांना त्यांनी गोडीन वाढवलं. कुटुंबाला प्रकाश देणाऱ्या त्यांना अकाली अंधत्व आलं. त्यांच्या जीवनात अंधार आला. परंतु बापूसाहेब दगडे पाटील यांनी वडिलांच्या जीवनात प्रकाशाचा दिवा लावण्याचे काम केलं वडिलांची अविरत सेवा केली.
वडील नावाचं व्यक्तिमत्व आपल्या जीवनात असं असतं जे मुलांना घडवण्यासाठी त्यांचं जीवन समृद्ध करण्यासाठी स्वतःच्या देहाचा आणि शरीराचा नाश करत. वडिलांच्या प्रेमापोटी घेतलेला असा अलौकिक सोहळा याआधी महाराष्ट्राने कधी पाहिला नव्हता तो बापूसाहेब दगडे पाटील यांनी घेतलेल्या या कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून पहायला मिळाला.



