‘महाराष्ट्रात काही अर्बन नक्सल NGOs ने इंडिया आघाडीला छुपा पाठिंबा दिला आहे’ या वक्तव्याची मुख्यमंत्री शिंदेंनी माफी मागावी – कायदेशीर नोटिसद्वारा मागणी

पुणे : ‘महाराष्ट्रात काही अर्बन नक्सल NGOs ने इंडिया आघाडीला छुपा पाठिंबा दिला आहे’ हे विधान मुख्यमंत्री शिंदे यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे कारण निर्भय बनो लोक-चळवळीचे एक सदस्य बाळकृष्ण उर्फ बंटी निढाळकर यांनी थेट एकनाथ शिंदेंना कायदेशीर नोटिस पाठवून जर शिंदेंना महाराष्ट्रातील अनेक अर्बन नक्सल NGOs माहिती आहेत तर त्यांनी त्वरित अर्बन नक्सल असलेल्या या सगळ्या NGOs ची माहिती पोलिसांना द्यावी तसेच अशा अर्बन नक्सल सामाजिक संस्थांची यादी जनतेसमोर जाहीर करावी अशी मागणी केली आहे.
बाळकृष्ण उर्फ बंटी निढाळकर यांनी ॲड. असीम सरोदे, ॲड. रमेश तारु व ॲड. संदीप लोखंडे यांच्यामार्फत पाठविलेल्या कायदेशीर नोटिसमध्ये असेही म्हणण्यात आलेले आहे की, मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने सतत राजकीय वागणे व सतत राजकीयच वक्तव्य करणे अयोग्य आहे, हे कुणी नागरिकाने आपल्याला सांगावे याची गरज पडू नये. महाराष्ट्रात सध्या पावसाचे पाणी तुंबल्याने लोकांचे जीवन धोकादायक होणे, शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाल्याने ते आर्थिक संकटात असणे, राज्यात पेट्रोल डिझेलचे भाव शेजारच्या काही राज्यांपेक्षा वाढीव असणे, स्पर्धापरीक्षा देणाऱ्या मुलांचे प्रश्न, राज्यातील बेरोजगारीची समस्या, स्त्रिया व मुलींच्या भरदिवसा होणाऱ्या हत्या, गरीब व अक्षम लोकांना अपघातात चिरडले जाणे, खतांच्या वाढलेल्या किंमती व बोगस बि-बियाण्यांचे प्रश्न, स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे, पर्यावरणाचे अनेक रखडलेले दुर्लक्षित विषय अशा अनेक समस्यांनी महाराष्ट्रातील जनतेला घेरलेले असताना तुम्ही अशा प्रश्नांवर गांभीर्याने आणि समस्यांवर उपाय काढायच्या दृष्टीने कधीच बोलतांना दिसत नाही हे महाराष्ट्रातील लोकांना वेदना देणारे आहे.’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने बेताल वक्तव्य करणे, राजकीय स्वरूपाचे आरोपच करत राहणे यातून मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा घालविण्याचाच उपक्रम करीत आहेत असेही नमूद करण्यात आलेले आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या ‘शिवसेना’या पक्षाचा ५८ वा वर्धापन दिन होता तेव्हा वरळी येथील भव्य डोम मध्ये तसेच भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत सुद्धा आपण असेच अर्बन नक्सल सामाजिक संस्था महाराष्ट्रात असल्याचे व त्या काही अर्बन नक्सल NGOs ने INDIA आघाडीला छुपा पाठिंबा दिला असल्याचे बेजबाबदार वक्तव्य केलेले आहे.



बाळकृष्ण भाऊसाहेब निढाळकर यांनी नोटिसमधून कळवले आहे की, ‘ते ‘निर्भय बनो’ या लोकशाही रक्षणासाठी काम करणाऱ्या लोकचळवळीचे सक्रिय सदस्य आहेत व निर्भय बनो ही NGO नाही. आम्ही महात्मा गांधी यांचे अहिंसक, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानिक विचार मानणारे व भारतावर प्रेम करणारे नागरिक एकत्र आलेलो आहोत. आम्हाला हिंसा मान्यच नाही. आम्हाला हिंसक क्रांती मान्य नाही. आम्हाला कोणत्याही धर्माच्या नावाने होणारी हिंसा मान्य नाही. आम्हाला जातीविषयी होणारी हिंसा मान्य नाही. जसा नक्षलवाद आम्हाला मान्य नाही तशीच धर्मांधता सुद्धा आम्हाला मान्य नाही. धर्मांधता हा एक आतंकवाद आहे तसाच धार्मिक आतंकवाद किंवा नक्षलवाद आम्हाला मान्य नाही.’
मुख्यमंत्रीपदावर असूनही एकनाथ शिंदे बेताल, बेकायदेशीर वक्तव्य करतात. ‘निर्भय बनो’या लोकचळवळीने लोकशाहीवर प्रेम करणारी एक नागरिशक्ती निर्माण केली आणि महाराष्ट्रातील महाविकासा आघाडी तसेच भारताच्या पातळीवर INDIA आघाडी यांच्यासाठी लोकसहभागातून मोठा राजकीय पाठिंबा तयार केला. आपल्या विरोधातील मत मांडणारे सगळेच देशद्रोही आहेत असा भ्रम पसरवणाऱ्या भाजप या पक्षासोबत असण्याचा परिणाम आपल्या बेताल वक्तव्यातून स्पष्टपणे दिसतो असे निढाळकर यांनी म्हंटले आहे.



नोटिसमधील मजकुरानुसार नक्षलवादी प्रवृतीच्या सामाजिक संस्थांची आपल्याला माहिती आहे अशाप्रकारचे मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेले जाहीर वक्तव्य अत्यंत गंभीर व महत्वाचे सुद्धा आहे कारण ही माहिती पोलिसांना देऊन अशा प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांच्या मदतीने त्यांनी कारवाई केली पाहिजे. परंतु अशा अनेक हिंसक कारवाया करणाऱ्या व अर्बन नक्सल विविध NGO या वास्तवात नसूनही शिंदेंनी असत्यावर आधारीत नरेटिव्ह पसरविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न मुख्यमंत्रीपदावर बसून केलेला असेल तर आपण ज्याप्रमाणे हे बेताल वक्तव्य त्यांनी जाहीरपणे केले त्याचप्रमाणे आपल्या बेजबाबदार आणि खोटारड्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्राच्याजनतेची जाहीर माफी मागावी अशी नम्र व लोकशाहीवर आधारित सूचना बाळकृष्ण उर्फ बंटी निढाळकर यांनी केली आहे.



