कोथरूड मध्ये भीषण अपघात बसचा ब्रेक फेल..पाच ते सहा गाड्यांना उडवले..

कोथरूड : कोथरूड मधील भुसारी कॉलनी येथे भीषण अपघात घडला असून ब्रेक फेल झाल्याने पीएमपीएल बसने पाच ते सहा गाड्यांना उडवल्याची घटना घडली आहे. यात अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी वर्दळीच्या वेळी चांदणी चौकातून कोथरूड डेपो कडे येणाऱ्या पी एम पी एल बसचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात घडला आहे. बसने चार ते पाच दुचाकी वाहनांना व रिक्षांना उडवले असून पदपथावर जाऊन बस थांबल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
या अपघातामध्ये राजेंद्र नलावडे, रा. गुलटेकडी पुणे, प्रणव अरुण साळवे (वय २५, रा. दौंड) आणि योगेश केमसे (वय ४६ रा. थेरगाव पुणे) हे तिघेजण गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सायंकाळच्या सुमारास पौड रस्त्यावर असणाऱ्या वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्याने मोठा गोंधळ उडाला होता. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत असून त्यांना जवळच्या रुग्णालयात स्थानिकांनी तातडीने हलवले आहे.
या संदर्भात भाजपचे गणेश वरपे म्हणाले की, रस्त्यावर पी एम पी एल च्या सुस्थितीतील असणाऱ्या बस रस्त्यावर धावणे गरजेचे आहे पण तसे होत नसल्याने असे अपघात घडत आहेत. आजच्या अपघातामध्ये सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी भविष्यात असे अपघात घडू नयेत म्हणून चांगल्या अवस्थेतील बस रस्त्यावर प्रवाशांच्या सेवेसाठी असणे गरजेचे आहे. अशा प्रकारामुळे पीएमपीएल प्रशासनाच्या चुकीची शिक्षा निष्पाप नागरिकांना बसत आहे. हा अपघात घडल्यानंतर उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संपर्क साधून जखमींना व्यवस्थित उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयाला सूचना दिलेल्या आहेत.
चांदणी चौकातून ब्रेक फेल होऊन बसचा होणारा अपघात हा पहिला नसून सातत्याने असे अपघात घडत असतात मात्र या संदर्भात प्रशासन कोणतीच उपाययोजना करत नसल्याचा आरोप मनसेचे प्रशांत कनोजिया यांनी केला आहे तसेच बसची देखभाल दुरुस्ती वेळेवरती होत नसल्याने असे अपघात घडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चांदणी चौकातून कोथरूड कडे येणारा उतार हा मृत्यूचा सापळा बनला असून या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.






