महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमा दरम्यान 11 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक रुग्णालयात

नवी मुंबई : खारघर येथे 306 एकर जागेवर झालेल्या भव्य कार्यक्रमात आज श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य शासनाच्या या भव्य कार्यक्रमाला गालबोट लागले असून या कार्यक्रमानानंतर 500 हून अधिक श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. तर 11 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
खारघर येथील कार्यक्रमाला धर्माधिकारींचे लाखो अनुयायी उपस्थित होते. त्यापैकी अनेक जण शनिवारीच कार्यक्रमस्थळी आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार धर्माधिकारी यांना प्रदान केला गेला. हा कार्यक्रम सकाळी 11.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू होता. भर दुपारी झालेल्या या कार्यक्रमामुळे श्री सदस्यांना प्रखर उन्हात बसावे लागले. त्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला. त्यांना तात्काळ घटनास्थळी उभारलेल्या 30 मेडिकल बूथमध्ये पाठवण्यात आले. मात्र रात्री पर्यंत या रुग्णांचा आकडा वाढत जात तो जवळपास 500 श्री सदस्यांपर्यंत पोहचला आहे. सर्व गंभीर रुग्णांना एमजीएम रुग्णालय व टाटा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दिवसभरात 11 श्री सदस्यांना मृत्यू झाला असून मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे.
यावरून कॉंग्रेस नेते अतुल लोंढे यांनी राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अतुल लोंढे ट्विट करत म्हणाले, “महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा कार्यक्रम भर दुपारी उन्हात ठेवण्यात आला होता. या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक गंभीर आहेत. हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे. यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे,” असं लोंढेंनी म्हटलं आहे.
दरम्यान ११ मृतदेह शवविच्छेदनासाठी पनवेल येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. प्रत्येक मृतदेहासोबत एक माणूस व गाडी शासनातर्फे देण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या त्यांच्या गावी त्यांचे नातेवाईक घेऊन जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.




