बाळासाहेब, अटलजी, आडवाणींना जे जमलं नाही ती किमया आम्ही करून दाखवली : तानाजी सावंत

पंढरपूर : “शिवसेनेच्या आमदारांचं बंडखोरीसाठी मतपरिवर्तन करण्यासाठी राज्यात तब्बल १५० बैठका मी घेतल्या”, असं विधान छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले होते. आता त्यांनी “जे बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण आडवाणी, अटल बिहारी वाजपेयी यांना जमलं नाही, ती किमया आम्ही करून दाखवली!” असा दावा केला आहे.
तानाजी सावंत म्हणतात, “ पंढरपुरात २०१७ मध्ये एक सभा आयोजित केली होती. आपला समाज, सोलापुरातील किंवा महाराष्ट्रातील जनतेला माहिती होतं की जे पटांगण आपण सभेसाठी घेतलं होतं, ते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्याही सभेला पूर्ण भरलं नाही. आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याही सभा तिथे झाल्या. पण त्या सभांनाही मैदान भरेपर्यंत गर्दी जमली नाही. अडवाणीजी यांच्याही सभांना तेवढी गर्दी झाली नाही. ती किमया या पंढरीच्या नगरीत सावंत बंधूंनी २०१७-१८च्या दरम्यान सात लाख लोकांचा मेळावा भरवून करून दाखवली. हा इतिहास आहे. सावंत बंधूंच्या नियोजनामुळेच उद्धव ठाकरेंच्या सभेला गर्दी जमली”, असं तानाजी सावंत म्हणाले आहेत.
दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या परंडा भागात आयोजित केलेल्या भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धेला तानाजी सावंत यांनी उपस्थिती लावली होती. तेव्हा त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीबाबत भूमिका मांडली. “उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल नाकारला. भाजप-शिवसेना युतीला कौल दिलेला असतानाही शरद पवार यांनी त्यात मिठाचा खडा टाकला. आणि जनमत डावलून पक्षप्रमुख ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केली. त्या सरकारमध्येही मला स्थान दिले नाही. त्यामुळे मी मातोश्रीवर जाऊन त्यांनाही सांगून आलो की मी आता पुन्हा पायरी चढणार नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यातूनही उध्दव ठाकरे यांनी आपल्याला दूर ठेवले. त्यामुळे संतप्त होऊन व आपण देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने ३ जानेवारीला राज्यात पहिली बंडखोरी केली”, असं तानाजी सावंत म्हणाले होते.




