फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे, असं विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. बावनकुळेंच्या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. तेली समाजाने संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. या कार्यक्रमाला फडणवीसही उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “जो-जो समाज त्यांच्याकडे गेला, ज्या-ज्या समाजावर अन्याय झाला. तो अन्याय देवेंद्र फडणवीसांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज आपली सर्वांची जबाबदारी आहे, किमान मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्राचं भविष्य केवळ देवेंद्र फडणवीस बदलू शकतात.”
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे काय झाले पाहिजेत? असा प्रश्न विचारत बावनकुळेंनी लोकांकडूनच प्रतिसाद घेतला. लोकांनी ‘मुख्यमंत्री’ असं उत्तर दिल्यानंतर बावनकुळेंनी संबंधित विधानाला सहमती देत पुढील भाषण केलं.




