वीर सावरकरांनी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांचा अपमान केला : आमदार प्रणिती शिंदे

सोलापूर : वीर सावरकर यांच्याविषयी माझ्या मनातही आदर होता. मात्र मी ‘सहा सोनेरी पानं’ हे पुस्तक वाचलं आणि माझं मत बदललं असं काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत याबद्दलचं विधान केलं आहे. कर्नाटकात काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याचबरोबर येणारी हजारो वर्षे हा देश महात्मा गांधी आणि नेहरुंचाच राहील. तो मोदी – सावरकरांचा कधीच नसेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे प्रणिती शिंदे यांनी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वीर सावरकरांविरोधात बोलताना त्यांनी म्हटले की, ” सावरकरांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आणि महिलांचा अपमान केला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांचं लोकसभेचं सदस्यत्व गेल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत वीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर असा केला होता. तसंच माझं आडनाव गांधी आहे सावरकर नाही मी माफी मागणार नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर बराच मोठा वाद झाला होता.




