
कोथरूड : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज आपल्या कोथरुड आणि बाणेर मधील कार्यालयात जनता दरबार घेऊन, नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी केवळ आश्वासनं देणं किंवा निवेदन स्विकारण्याऐवजी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करुन थेट कार्यवाही करण्यावर भर दिला.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री यांनी आज आपल्या कोथरुडमधील बाणेर, बालेवाडी आणि कोथरुड भागतील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी जनता दरबारचे आयोजन केले होते. यावेळी बाणेर भागातील नागरिकांनी पाणीपुरवठा, विद्युत विभाग, रस्ते, मलनिस्सारण, नालेसफाई, कचऱ्याची समस्या, अनाधिकृत स्टॉल संदर्भातील समस्या मांडल्या. यातील बहुतांश समस्या महापालिकेच्या विभागाशी संबंधित होत्या. त्यामुळे पाटील यांनी थेट पालिका अधिकाऱ्यांना फोन करुन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.




बाणेरमधील डीएसके विद्यानगरी सोसायटीच्या नागरिकांनी भागातील कचऱ्याची समस्या, सेवा रस्त्याची दुरवस्था आदी समस्या मांडल्या पाटील यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना संपर्क साधून दोन्ही समस्या तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
तसेच, प्रथमेश पार्क,ॲन्जोर सोसायटी बहुतांश सोसायटीच्या नागरिकांनी पाणीपुरवठ्याची समस्या मांडली. त्यावर नामदार पाटील यांनी महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अनिरुद्ध पावसकर यांना संपर्क साधून प्रत्यक्ष पाहाणी करुन, तातडीने समस्या सोडविण्याची सूचना केली.
तर डावी भुसारी भागातील नागरिकांनी अतिक्रमणावर कारवाईची समस्या मांडली. त्यावर क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच हॅप्पी कॉलनी वेल्फेअर फेडरेशच्या सभासदांनी आपल्या अडचणी नामदार पाटील यांना सांगितल्या. सदर अडचणी सहकार विभागाशी संबंधित असल्याने सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून दखल घेण्याची सूचना केली.















