बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी परिसरात मिशन निर्मल ५० दिवसात– ५० किलोमीटर स्वच्छतेचा अखंड संकल्प पूर्णत्वास….

अमोल बालवडकर फाउंडेशनचा उपक्रम
पुणे : बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी आणि सुस, म्हाळुंगे परिसरात अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “मिशन निर्मल” अंतर्गत मागील काही दिवसांत व्यापक प्रमाणात परिसराची साफसफाई करण्यात आली. या उपक्रमा अंतर्गत स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून दररोज जगली जाणारी जबाबदारी आहे हा स्पष्ट संदेश नागरिकांपर्यंत ठामपणे पोहोचवण्यात आला. अशी माहिती माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली.
अमोल बालवडकर म्हणाले, परिसरात कचरा करणाऱ्यांवर यापुढे कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे डस्टबीन नाही, त्यांनी तात्काळ डस्टबीनचा वापर करावा आणि स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत, अशी जागरूकता मोहीम हाती घेण्यात आली. डस्टबीन नसेल आणि कचरा केला तर दंड अपरिहार्य आहे” हे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

स्वच्छता पाळावीच लागेल; तुमच्या घरासमोर किंवा दुकानासमोर कचरा दिसला तर ती जबाबदारी तुमचीच अशा थेट आणि स्पष्ट भाषेत नागरिकांना स्वच्छतेच्या शिस्तीची जाणीव करून देण्यात आली. परिसर तुमचाच असल्याने, कुणीही कचरा टाकला तरी तो दिसणं म्हणजे संपूर्ण समाजाची सामूहिक चूक ही जाणीव नागरिकांमध्ये दृढ करण्यात आली.
कुणीही कचरा करायचा नाही, परिसर स्वच्छ ठेवायचा आणि इतरांनाही स्वच्छतेबाबत जागरूक करायचं या भूमिकेला नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.
त्याचबरोबर, स्वच्छता ठेवाल तर लोक तुमच्याकडे आदराने पाहतील; ग्राहकही स्वतःहून तुमच्याकडे येतील या संदेशातून स्वच्छता ही सामाजिकच नाही तर आर्थिक प्रगतीची देखील गुरुकिल्ली असल्याचा महत्त्वपूर्ण विचार पुढे मांडला.
आक्रमक वाटणारी ही भाषा प्रत्यक्षात परिसरावरील प्रेम आणि त्याला अधिक सुंदर, अधिक स्वच्छ ठेवण्याच्या तळमळीमधून आलेली आहे. आणि हीच भावना नागरिकांपर्यंत पोहोचल्याने त्यांनीही जबाबदारीने आणि उत्साहाने प्रतिसाद दिला.स्वच्छता ही एका व्यक्तीची नाही, तर संपूर्ण समाजाची शिस्त आहे.याच सामूहिक विचारातून “मिशन निर्मल”चा प्रवास अधिक ताकदीने पुढे जात आहे. असेही अमोल बालवडकर म्हणाले.



