भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी देशाची माफी मागावी : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने कठोर शब्दांमध्ये फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या टिप्पणीद्वारे देशात तणाव निर्माण केल्याबद्दल “संपूर्ण देशाची माफी मागावी” असे म्हटले आहे.
धमक्यांचा हवाला देत नुपूर शर्माने त्यांच्याविरुद्ध देशभरात दाखल केलेल्या अनेक एफआयआर दिल्लीला हस्तांतरित करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना देशात सध्या जे काही सुरु आहे ते तुमच्यामुळेच असं सुनावलं.
कोर्टाने फटकारताना केलेली महत्वाची विधानं –
1) नुपूर शर्मा यांच्या वकिलाने त्यांना धमक्या मिळत असून प्रवास करणं सुरक्षेचं नाही असा युक्तिवाद केला असता न्यायमूर्ती सूर्यकांत दास म्हणाले की, “त्यांना धमक्या मिळत आहेत की त्याच धोका ठरत आहेत? देशात जे काही सुरु आहे त्यासाठी ही महिला एकटी जबाबदार आहे”.
2) “त्यांना कशाप्रकारे भडकावण्यात आलं होतं ती चर्चा आम्ही पाहिली. पण ज्याप्रकारे त्यांनी विधान केलं आणि नंतर वकील असल्याचं सांगितलं हे लज्जास्पद आहे. त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागायला हवी,” असं न्यायाधीशांनी सांगितलं.
दिल्ली पोलीस, वृत्तवाहिनीवरही ताशेरे
3) सुप्रीम कोर्टाने यावेळी दिल्ली पोलीस आणि चर्चेचं आयोजन करणाऱ्या वृत्तवाहिनीवरही ताशेरे ओढत म्हटलं की, “दिल्ली पोलिसांनी काय केलं? आम्हाला तोंड उघडायला लावू नका. टीव्हीवरील चर्चा नेमकी काय होती? फक्त एका अजेंड्यासाठी होती का? त्यांनी हा विषय का निवडला?”.
4) सुप्रीम कोर्टाने यावेळी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटलं की, “जेव्हा तुम्ही इतरांविरोधात गुन्हा दाखल करता, तेव्हा लगेच अटक केली जाते. पण इथे तुमच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोणी हात लावण्याची हिंमतही केली नाही”.
5) नुपूर शर्मा यांना फटकारताना सुप्रीम कोर्टाने यावेळी त्यांचा हट्टी आणि गर्विष्ठ स्वभाव यातून दिसत असल्याचं म्हटलं. “त्या पक्षाच्या प्रवक्त्या आहेत म्हणून काय झालं. आपल्यामागे सत्ता आहे आणि कायद्याची हमी न बाळगता आपण काहीही वक्तव्य करु शकतो असं त्यांना वाटत आहे,” अशा शब्दात न्यायमूर्ती सूर्यकांत दास यांनी सुनावलं आहे.
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या शर्मांच्या वादग्रस्त विधानामुळे जीव जात आहेत.
6) “नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उदयपूरमध्ये एका शिवणकाम व्यावसायिकाला आपला जीव गमवावा लागला आहे,” असं कोर्टाने निदर्शनास आणून दिलं.




