डॉ. लता पाडेकरांच्या लिखाणात मूल्यशिक्षण पेरणाऱ्या रंजक नाट्यछटा : प्रा. प्रवीण दवणे

पुणे : नाट्यछटा हा साहित्यप्रकार काहीसा दुर्मिळ होत असतानाच ‘प्रकाश पेरण्यासाठी – खजिना नाट्यछटांचा’ या पुस्तकातून डॉ. लता पाडेकर यांनी अत्यंत साध्या, सोप्या आणि रंजक भाषेतून मूल्ये रूजविण्यासाठी नव्या पिढीच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या नाट्यछटा लिहिल्या आहेत,” असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक आणि गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांनी काढले.
बालदिनाचे औचित्य साधून प्रा. प्रवीण दवणे, लोकसाहित्याचे अभ्यासक मा. रा. लामखडे, विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणेचे संपादक संदीप तापकीर, माजी पर्यवेक्षिका राधिका बडगुजर, स्तंभलेखक संजय नलावडे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन विद्या विकास मंदिर, राजुरी याठिकाणी झाले.
नाट्यछटा म्हणजे काय तर आपले वय विसरून अत्यंत कमी वेळेत एकजणच अनेक भूमिकांचा कसा अभिनय करतो आणि जाता जाता अंतर्मुख करायला लावतो, हे समजण्यासाठी नील भंडारी, चैत्राली कांबळे आणि कल्याणी माने यांनी प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येकी एक नाट्यछटा सादर करून दाखविली. त्याला प्रेक्षकांची उत्तम दादा मिळाली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले. पुस्तकातील सर्व चित्रं काढणाऱ्या आरती हटृंगडी यांचेही विशेष कौतुक यावेळी करण्यात आले. लेखिकेच्या मनोगतातून बालपणापासून आतापर्यंतच्या प्रवासाची वाट समजली. अनवाणी पायाने शिक्षणासाठी पुण्याला येणारी मुलगी शिक्षिका बनून लेखिका म्हणून वावरतानाचा प्रवास डॉ. लता पाडेकर यांनी सांगितला. यावेळी अनेकांचे डोळे भरून आले.
प्रा. प्रवीण दवणे यांनी या पुस्तकातील ३१ नाट्यछटांपैकी अनेक नाट्यछटांचा परामर्श घेतला. “विशेषतः बालांचा वयोगट लक्षात घेऊन या नाट्यछटा लिहिल्या गेल्यामुळे स्नेहसंमेलनातही सादर करण्यास त्याची मोलाची मदत होईल . विश्वकर्मा ह्या नामवंत प्रकाशनाने उत्कृष्ट निर्मितीमूल्य जपत हे पुस्तक वेधक केले आहे. कला, विज्ञान मनोरंजन, बालपणीच्या आठवणी जपणाऱ्या, भाषेतील लालित्य पेरीत येणारा हा ज्ञानप्रकाश नव्या पिढीला सकस वाचनाकडे नेईल, याची मला खात्री वाटते,” असेही ते म्हणाले.
राधिका बडगुजर यांनी धिटुकली पणतीसुद्धा कसा प्रकाश पेरते हे विशद केले. वाचन करताना नाट्यछटा कशा आटोपशीर आहेत हे आवर्जून सांगितले.
स्तंभलेखक संजय नलावडे यांनी या साहित्यप्रकाराचे कौतुक करून या नाट्यछटा सर्वदूर पोहचण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविलेले मा.रा.लामखडे यांनी शालेय जीवनापासून साहित्यिक कसा घडतो, त्यासाठी खूप वाचन केले पाहिजे हे स्वानुभवावरून सांगितले.
या प्रसंगी राजुरी गावचे माजी सभापती दीपक आवटे, सरपंच प्रियाताई हाडवळे, अजय कणसे, आंतरराष्ट्रीय चित्रकार दत्ता पाडेकर, संशोधक डॉ. भरत पाडेकर, ज्ञानेश्वर गटकळ, संगीता सरोदे, अंजनी डुंबरे, वारुळे मॅडम, भाऊसाहेब हांडे, गंगाराम बाबा डुंबरे, लेखिकेचे आई-वडील आदी उपस्थित होते.
प्राचार्य जी. के. औटी यांनी प्रास्ताविक केले. संदीप वाघोले यांनी सूत्रसंचालन केले. संदीप तापकीर यांनी पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगितली. क्रीडाशिक्षक संतोष गोपाळे आणि सर्व शिक्षकवृंद यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.



