चंद्र्शेखर धर्माधिकारी लिखित , “गावाकडच्या वल्ली” कथा संग्रहाचे प्रकाशन संपन्न..

वारजे साहित्यिक कट्टयावर पार पडला प्रकाशन सोहळा
वारजे : वारजे साहित्यिक कट्टा आयोजित चंद्र्शेखर धर्माधिकारी लिखित “गावाकडच्या वल्ली” या कथा संग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक प्रा.विश्वास वसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या माजी कार्याध्यक्षा डॉ माधवी वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
कथा हा एक वाचनप्रिय साहित्य प्रकार आहे.अनेकत्वातून एकत्व व्यक्त करणे हा जीवनाप्रमाणे सर्वच कथांचा धर्म आहे.कथेला विशिष्ठ कालप्रमाणे घडलेल्या घटनांचे कथानक असते. एका विशिष्ठ स्थळकाळी पागांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एका दृष्टीकोनातून केलेले चित्रण म्हणजे लघुकथा असे मत प्रा.विश्वास वसेकर यांनी यावेळी व्यक्त केले.

वि.दा.पिंगळे म्हणाले , दलित व ग्रामीण साहित्याने एकूण साहित्याचा केंद्रबिंदू हालवला . खेड्यापाड्यात शिक्षण पोहचले आणि मोठी क्रांती झाली. शिकलेल्या पोरांनी आपल्या कष्टकरी बापाच्या कथा लिहायला सुरुवात केली. ग्रामीण साहित्यमुळे शेतकरी , शेतमजूर , बाराबलुतेदार हे साहित्याचे नायक होऊ शकले , त्यांचे व्याकूळ जीवनाचे चित्रण समोर आले. ग्रामीण लेखक व कवींनी मुक्त साहित्यास शस्त्र दिले.
कार्यक्रमाचे आयोजक बाबासाहेब धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी स्वागत केले. पुस्तकाचे लेखक यांनी कथा लिहिण्यामागची प्रेरणा , अनुभव , कथन केले. या प्रसंगी डी.के.जोशी, प्राचार्य नंदकिशोर बोधाई , साधना कुलकर्णी, महेश कुलकर्णी, जयंत मोहिते, अदिती गोडबोले, प्रकाशक सुमित सातपुते उपस्थित होते. अतुल घटवाई यांनी सूत्रसंचालन केले. तर वैभव धर्माधिकारी यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ नागरिक सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व सभासद उपस्थित होते.









