रामदास कदमांना विधानभवनात जाण्यापासून रोखले…

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांना विधानभवनात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. आरटीपीसीआर चाचणी केली नसल्याने कदम यांना पोलिसांनी आत प्रवेश दिला नाही.
फोनाफोनी केल्यावर बऱ्याच वेळानंतर त्यांना आत सोडण्यात आले. त्यामुळे कदम प्रचंड वैतागले. आरटीपीसीआर चाचणी केली का अशी विचारणा कदम यांना करण्यात आली. कदम यांनी नाही असे उत्तर दिल्याने त्यांना आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला. जोपर्यंत आरटीपीसीआर चाचणी करून येत नाही तोपर्यंत आतमध्ये प्रवेश मिळणार नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावेळी कदम यांनी सुरक्षा रक्षकांसोबत वादही घातला. मात्र, तरीही त्यांना आतमध्ये जाऊ दिले गेले नाही. त्यानंतर कदम हे बराच वेळ विधानभवनाच्या बाहेर उभे होते. त्यानंतर त्यांना आत सोडण्यात आलं. कदम यांनी काही दिवसांपूर्वीच परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.




