मीटरनुसार पाणी बिल आकारणीस शिवसेना” (उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचा विरोध ; पृथ्वीराज सुतार यांनी दिला आंदोलनाचा इशारा..

पुणे : नाव बदललेली समान पाणी पुरवठा योजना ही पुणेकरांची फसवणुक करणारी योजना असून ती फक्त काही लोकांच्या फायद्यासाठी राबविण्यात येत आहे. पुणे महापालिका प्रशासनाने पालकमंत्री यांच्याकडे घरा-घरांमध्ये बसविण्यात आलेल्या पाणी मीटरच्या रिडींगनुसार पाण्याचे बिल अकारण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. मात्र अशा बिल आकारणीस शिवसेना” (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध असल्याचे शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी जाहीर केले आहे.
या संदर्भातील निवेदन पृथ्वीराज सुतार यांच्याकडून महापालिका प्रशासक विक्रम कुमार यांना देण्यात आले असून जर प्रशासनाने मीटरनुसार पाणी बिल घेण्याबाबत पुणेकरांना वेठीस धरले तर शिवसेना” (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ही आपल्या पध्दतीने पुणेकरांसह तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.
सुतार यांनी म्हंटले आहे की, २४x७ ही पाणीपुरवठयाची फसवी योजना पुणे शहरामध्ये मनपाने राबविली आहे. याचा डीपीआर मुख्य सभेने जो मान्य केला त्याप्रमाणे या योजनेचे लाभ प्रत्यक्षात सुरू नाही. मनपाच्या व अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे मनपाला आर्थिक भुर्दंड बसला असून, सदरचे पैसे हे पुणेकरांच्या कररूपी पैशातून दिले जात आहेत.
२४x७ या पाणीपुरवठा योजनेचा अर्थ होता बाराही महिने, चौवीस तास पाणीपुरवठा पुणेकरांना मिळणार. काही दिवसांनी या योजनेचे नाव झाले समान पाणी पुरवठा आणि आता ही योजना आहे कधी-कधी पाणी पुरवठा योजना होऊन बसली आहे. ही योजना सुरूवातीपासुन वादात अडकली आहे. त्याच्या इस्टिमेटपासुन ते टेंडर प्रक्रियेपर्यंत ही योजना वेगवेगळ्या कारणांमुळे लांबली गेली.
या योजनेमध्ये काही तांत्रिक बदल करणे आवश्यक आहेत. ज्यामुळे या प्रकल्प खर्चामध्ये बचत होऊन मनपाची आर्थिक बचत होणार आहे तसेच जर हे तांत्रिक बदल केले नाहीत तर या योजनेचा पुणेकरांना हवा तसा फायदा होणार नाही आणि पाण्याची समस्या संपूर्णपणे सुटणार नाही, अशा चुकीच्या योजनेमुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. असे सांगून मनपाचे हित सांभाळणाऱ्या काही प्रामाणिक अधिकाऱ्यांना या कामातून मुक्त करून त्यांची बदली करण्यात आली असल्याचा आरोप सुतार यांनी केला आहे.
या योजनेमुळे पुणेकर नागरिकांना काहीही फायदा होत नाही, अजूनही पुणे शहरामध्ये पाण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. पाणी पुरवठयाचे काम पूर्ण झाले नसताना सुध्दा मीटर बसविण्याचे काम घाई-घाईत करण्यात आले आहे. हे फक्त कंपनीच्या व काही लोकांच्या फायदयाचा विचार करून, वेळ कोणती निवडली तर लोकप्रतिनिधी मनपामध्ये नसताना. यामुळेच या योजनेबाबत अजून संशय वाढत चाललेला आहे.
जोपर्यंत पुणे शहरातील सर्व भागातील सर्व नागरिकांना २४x७ या मूळ योजनेप्रमाणे २४ तास पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत मीटर प्रमाणे पाण्याचे बील देऊ नये. जर प्रशासनाने पुणेकरांना वेठीस धरले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पृथ्वीराज सुतार यांनी दिला आहे.




