सदाशिव पेठ तरुणी हल्ला प्रकरण : तीन पोलिस निलंबित

पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत महाविद्यालयीन तरुणीवर एका तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. भररस्त्यात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या हल्ला प्रकरणात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
पुणे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे अंतर्गत पेरूगेट चौकीतील पोलिस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबतचे आदेश गुरुवारी (ता. २८) रात्री जारी करण्यात आले आहेत.
पोलीस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सदाशिव पेठेत मंगळवारी सकाळी एका तरुणाने महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून तिच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार करून जखमी केले होते.

तसेच, या तरुणीसमवेत असलेल्या मित्रावर कोयत्याने वार करून हाताच्या अंगठ्याला दुखापत केली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१) या आरोपीला अटक केली. परंतु पेरूगेट पोलrस चौकीच्या हाकेच्या अंतरावर हा सर्व थरार सुरू असताना चौकीतील हे तीन पोलिस कर्मचारी गैरहजर होते.
त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त गिल यांनी दिली. दरम्यान, आरोपी शंतनू जाधव या तरुणाला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून सध्या त्याची पोलिस चौकशी सुरू आहे.






