बाबा धुमाळ व दिपाली धुमाळ हे समाजाचे वैचारिक पोषण व्हावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या मोजक्या लोकप्रतिनीधीं पैकी एक : प्रा. मिलिंद जोशी

वारजे : सातत्याने साहित्यिक उपक्रम राबवून समाजाचे वैचारिक पोषण झाले पाहिजे यासाठी काम करणारे काही थोडेच लोकप्रतिनिधी असून त्यापैकी बाबा धुमाळ व दिपाली धुमाळ हे एक आहेत. असे मत साहित्यिक, प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
मराठी राजभाषा दिनानिमित्त पुणे महापालिका साहित्यिक कट्टा वारजेच्या वतीने मराठी भाषा अध्यापकांचा सन्मान व “मराठी आमची असे मायबोली” या विषयावर प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी नगरसेवक बाबा धुमाळ साहित्यिक वि.दा.पिंगळे व परिसरातील नागरिक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जोशी पुढे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा विषय सर्वच मराठी माणसाच्या अस्मितेशी निगडित आहे. या विषयासाठी माझ्या सहकाऱ्यांनी राज ठाकरे, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. महाविकास आघाडी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दिल्लीत जाऊन गाठीभेटी घेतल्या याचा मला अभिमान वाटतो. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती जपायचे असेल तर त्याचे संस्कार शालेय जीवनापासून मुलांवर करणे आवश्यक आहे व त्यासाठी शिक्षक व पालकांनी दोघांनी जबाबदारी घेणे गरजेचे आहे, असे जोशी म्हणाले.

दिपाली धुमाळ म्हणाल्या, की मराठी भाषा ही समृद्ध भाषा असून मातृभाषा म्हणून आपल्याला तिचा अभिमान आहे. मराठी राजभाषा दिन हा एका दिवसापुरता साजरा न करता तो रोज साजरा झाला पाहिजे. आम्ही सातत्याने वारजे साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून मराठी साहित्याच्या विविध साहित्य प्रकारांच्या अनुषंगाने कार्यक्रम घेत आलो आहोत व सर्व कार्यक्रमांना साहित्य प्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवनवीन मराठी साहित्यिक वारजे साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून घडतं आहेत.









