दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार

मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना विशेष मूल्यांकन पद्धतीनं मार्क्स देण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. दहावी आणि बारावीचे प्रत्यक्ष वर्गी सुरु झाले आहेत. म्हणूनच आता राज्यात या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.
राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेतल्या जाणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. इयत्ता बारावीची बोर्डाची लेखी परीक्षा ही 4 मार्च 2022 ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्डाची परीक्षा ही 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या दरम्यान घेण्यात येणार आहे. दरम्यान या सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनच्या प्रादुर्भावामुळे सर्व विद्यार्थ्यांचे वर्ग हे ऑनलाईन पद्धतीनं सुरु होते. परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनंच घेतल्या जात होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनं होणार आहेत अशी घोषणाही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांना कोरोनचे नियम पाळणं बंधनकारक
परीक्षा जरी ऑफलाईन पद्धतीनं होणार असल्या तरी परीक्षांच्या दरम्यान कोरोनाचे नियम पाळूनच विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. तसंच शाळा आणि सेंटर्सकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ते नियम पाळले जाणार आहेत अशीही माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे



